पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाची झडप; दिंडीत घुसलेल्या कारने ७ जणांना चिरडलं

मुंबई तक

• 03:42 PM • 31 Oct 2022

सांगोला : पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे झालेल्या या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून ही दिंडी निघाली होती. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील […]

Mumbaitak
follow google news

सांगोला : पंढरपूरला कार्तिकी यात्रेसाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत चारचाकी गाडी घुसल्याने भीषण अपघात झाला. सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे झालेल्या या अपघातात ७ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून ही दिंडी निघाली होती.

हे वाचलं का?

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी येथून ३२ वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला निघाली होती. ही दिंडी सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मिरज – पंढरपूर मार्गावर सांगोला तालुक्यातील जुनोनी बायपास येथे पोहचली होती.

त्यावेळी मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी MH 12 DE 7938 हि टाटा नेकसोन ही चारचाकी गाडी दिंडीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरात होती की वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन गाडी थांबली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला, एक पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या ७ वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून मृत वारकऱ्यांच्या शवविच्छेदनास सुरुवात झाली आहे. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हलविले आहे. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातग्रस्त गाडी सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा :

वारकऱ्यांच्या या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

    follow whatsapp