कधी काळी चालवायचे रिक्षा! कोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांच्यामुळे ठाकरेंचं सरकार आलंय संकटात?

मुंबई तक

• 12:42 PM • 21 Jun 2022

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अवघ्या काही तासांत देशभरात पोहोचले. हिंदुत्वाची कास धरत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आहे. सध्या सुरतमध्ये असलेल्या शिंदेंच्या बंडामुळे, मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता बळावली आहे. सेनेचे निष्ठावंत असलेले शिंदे यांची अचानक केलेल्या बंडखोरीमुळे प्रकाश झोतात आले आहेत…उद्धव ठाकरे हे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करत आहेत. एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अवघ्या काही तासांत देशभरात पोहोचले. हिंदुत्वाची कास धरत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आहे. सध्या सुरतमध्ये असलेल्या शिंदेंच्या बंडामुळे, मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता बळावली आहे. सेनेचे निष्ठावंत असलेले शिंदे यांची अचानक केलेल्या बंडखोरीमुळे प्रकाश झोतात आले आहेत…उद्धव ठाकरे हे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

एकनाथ संभाजी शिंदे… जन्म 9 फेब्रुवारी 1964. ठाणे जिल्ह्यातील अहिर या गावात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी रोजगार मिळवण्यासाठी गावावरून ठाणे गाठले.

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने एकनाथ शिंदेंना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शिक्षण सोडून शिंदेंनी मग मासळी बाजारात काम सुरू केलं. त्याबरोबर वडिलांनी घेतलेला टँम्पो चालवला. परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या शिंदेंनी काही वर्ष रिक्षाही चालवली.

एकनाथ शिंदे यांचा असा संघर्ष सुरू असताना त्या काळात ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. शिवसेना मुंबई बाहेर पडत होती. त्यावेळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती.

समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण होत होता. एकनाथ शिंदेही शिवसेनेकडे ओढले गेले. त्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

आनंद दिघे यांनी १९८४ मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. शिवसेनेत आले त्यावेळी एकनाथ शिंदे होते 20 वर्षांचे.

याच काळात कर्नाटक-बेळगाव सीमा भागाचा वाद सुरू होता. या आंदोलनात एकनाथ शिंदे सहभागी झाले. याच काळात त्यांना 40 दिवस कारावास भोगावा लागला. आनंद दिघेंच्या नेतृत्वाखील त्यांनी अनेक आंदोलनं केली. आनंद दिघेंचे कट्टर सर्मथक म्हणून त्यांची एक ओळख निर्माण होऊ लागली होती.

वाढता जनाधार बघून त्यांनी ठाणे पालिकेची निवडणूक लढवली अन् विजयी झाले. आनंद दिघेंच्या आशीर्वादाने सभागृह नेते म्हणून कामकाज पाहिलं. इथूनच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तिथून त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर टाकली. जिल्हाप्रमुख असताना त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्हा पालथा घातला. दिघेंच्या जाण्याने मरगळ आलेल्या शिवसैनिकांना सक्रिय करण्याचं काम शिंदेनी केलं.

२००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते.

त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. पुढे जाऊन त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवलं. ठाण्यात त्यांनी एक दबदबा त्यांनी निर्माण केला.

2014 साली युतीच्या सरकरामध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. महत्वाची खाते आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांना देण्यात आलं. पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील काही महत्त्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली.

मागील अडीच वर्षांपासून ते नगर विकासमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. याचबरोबर त्यांचा मुलगा श्रींकात शिंदे यांना देखील ठाणेकरांनी लोकसभेत पाठवलं. 2019 साली सत्ता संघर्षादरम्यान एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होतं.

मात्र, महाविकास आघाडीत ऐनवेळी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची संधी गेल्यानं ते नाराज असल्याच्या बातम्या अधून मधून येत गेल्या होत्या. पण अखेर त्यांची नाराजी समोर आली. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काय झालं आणि त्यानंतर आता काय होतंय याची कल्पना आपल्या सर्वांना आलीये.

आता कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड शमतं की शिवसेना फोड़ून ते भाजपसोबत जातात आणि त्यांना अपेक्षित असलेली पदं मिळवतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या येणाऱ्या काळत मिळतील.

    follow whatsapp