देवेंद्रजी, आपल्या भूमिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण…; संजय राऊतांच पत्र

मुंबई तक

04 Apr 2023 (अपडेटेड: 04 Apr 2023, 07:20 AM)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

sanjay raut letter to devendra fadnavis in curruption cases

sanjay raut letter to devendra fadnavis in curruption cases

follow google news

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. “महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती. बाजार बुणगे सरकारात आहेत. आपल्या सोबत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणार?”, असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना केला आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत पत्रात म्हणतात, “आताच (1एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला. आपण म्हणता, ‘मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!”

हेही वाचा – ठाकरे गटातील महिलेला शिंदे गटाकडून मारहाण; वादाचं कारण आलं समोर

“देवेंद्रजी, आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात, तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत कारवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेट ईच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात”, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

संजय राऊतांना का हवीये देवेंद्र फडणवीस यांची भेट?

“मी खालील भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छतो”, असं म्हणत राऊतांनी काही मुद्दे पत्रात मांडले आहेत.

– “भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून, किमान 500 कोटींचे मनी लाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.”

समजून घ्या – गिरीश बापट यांच्यानंतर पुण्याचा दावेदार कोण?

– “आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (मालेगाव) यांनी गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटींचे 25 लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचवण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स फक्त 47 शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो”, असं संजय राऊत या पत्रात म्हणतात.

सोमय्यांना क्लीन चीट हे धक्कादायक; राऊतांनी पत्रात फडणवीसांना काय म्हटलं आहे?

– “किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्ध नौका वाचवण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना क्लीन चिट दिली, हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे.”

“वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp