Latest Political News Maharashtra: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (2 जुलै) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. ज्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण हे आता केंद्रस्थानी आलं आहे. या संपूर्ण राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अनाकलनीय अशा स्वरूपाची झाली आहे. अशावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की, ‘महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील दिगू टिपणीस झाला आहे.’ याच सगळ्या राजकीय परिस्थितीबाबत आज (3 जुलै) राज ठाकरेंनी छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. पण याच पत्रकार परिषदेत त्यांनी एक मोठा बॉम्ब टाकला आहे.
ADVERTISEMENT
‘पवार साहेब किती काही म्हणत असले की, त्यांचा काही संबंध नाही वैगरे या गोष्टीचा.. दिलीप वळसे-पाटील, प्रफुल पटेल, छगन भुजबळ वैगरे वैगरे.. हे असेच जाणार नाहीत हे पाठवल्याशिवाय.. मला उद्या पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया पवार या केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयरसुतकच राहिलेलं नाही.’ असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.
म्हणजेच अजित पवारांच्या बंडाला शरद पवार यांचा छुपा पाठिंबा असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं आहे. कालच्या आपल्या ट्विटमध्ये देखील राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की, राष्ट्रवादीची पहिलीच सत्तेत सहभागी झाली असून लवकरच दुसरी टीमही सत्तेच सोपान गाठण्यासाठी रवाना होईल.
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचा शरद पवारांवरच निशाणा
‘मी काल माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे… महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षापासून जे राजकारण सुरू झालेलं आहे ते दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललं आहे. या लोकांना मतदारांशी काहीही देणंघेणं नाही. कोण कुठल्या पक्षाचे जे काही एकनिष्ठ मतदार असतील ते का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी म्हणून वाटेल त्या तडजोडी करायच्या.’
हे ही वाचा >> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story
‘सध्या महाराष्ट्रात जे पेव फुटलंय.. मला असं वाटतं की, लोकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसात मेळाव घेणार आहे. मला महाराष्ट्राशी बोलायचं पण आहे. माझा लवकरच महाराष्ट्र दौरा देखील सुरू होईल. त्यावेळी मी जागोजागी जाईन लोकांना भेटेन..’
‘यातील एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या.. पवार साहेब किती काही म्हणत असले की, त्यांचा काही संबंध नाही वैगरे या गोष्टीचा.. दिलीप वळसे-पाटील, प्रफुल पटेल, छगन भुजबळ वैगरे वैगरे.. हे असेच जाणार नाहीत हे पाठवल्याशिवाय..’
‘मला उद्या पवार साहेबांच्या कन्या सुप्रिया पवार या केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयरसुतकच राहिलेलं नाही.’
‘या सगळ्याची सुरुवात पहाटेच्या शपथविधीने झाली होती. मग शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी झालं. आता शत्रू कोण मित्र कोण.. कशाचा कशाला महाराष्ट्रात काही राहिलेलंच नाहीए. मी मेळावा घेईन त्यावर मी तुमच्याशी सगळ्या गोष्टी बोलेन.. मेळाव्याला..’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी केलं आहे.
राज ठाकरेंनी काय केलं होतं ट्विट?
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
हे ही वाचा >> Rohit Patil: शरद पवार की अजित पवार.. R. R. पाटलांचा मुलगा कोणाच्या बाजूने?
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार? असं ट्विट राज ठाकरेंनी काल केलं होतं.
ADVERTISEMENT