ऑस्ट्रेलियात मी घेतलेल्या निर्णयाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं – अजिंक्य रहाणेने बोलून दाखवली खदखद

मुंबई तक

• 08:19 AM • 10 Feb 2022

भारतीय कसोटी संघाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला काही दिवसांपूर्वीच आपलं पद गमवावं लागलं. सातत्याने खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अजिंक्यच्या संघातल्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अजिंक्य हा नेहमी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतू नुकतच एका मुलाखतीत त्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या Backstage with Boria या कार्यक्रमात बोलत […]

Mumbaitak
follow google news

भारतीय कसोटी संघाचा माजी उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला काही दिवसांपूर्वीच आपलं पद गमवावं लागलं. सातत्याने खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अजिंक्यच्या संघातल्या स्थानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अजिंक्य हा नेहमी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. परंतू नुकतच एका मुलाखतीत त्याने आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे.

हे वाचलं का?

क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या Backstage with Boria या कार्यक्रमात बोलत असताना अजिंक्यने अनेक विषयांवर आपलं मत मांडलं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघासमोर हजारो अडचणी असताना अजिंक्यने ऐतिहासीक विजय मिळवून दिला होता. परंतू मैदानावर आणि ड्रेसिंग रुममध्ये मी घेतलेल्या निर्णयाचं श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन गेला असंही अजिंक्य म्हणाला.

Ind vs WI : सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताचा विजय, मालिकेतही विजयी आघाडी

“जी लोकं म्हणतायत की माझं करिअर आता संपलं आहे ते ऐकून मला खरंच हसायला येतं. ऑस्ट्रेलियात आणि त्याच्या आधीही काय झालं होतं हे सर्वांना माहिती आहे. मी कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यांना हा खेळ समजतो ते या विषयावर अशा प्रतिक्रीया देणार नाहीत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी काय केलं आहे हे मला माहिती आहे. माझा हा स्वभाव नाही की एखाद्या गोष्टीचं श्रेय मी स्वतःहून पुढे येऊन घेईन. काही निर्णय मैदानात, ड्रेसिंग रुममध्ये मी घेतले परंतू त्यांचं श्रेय कोणीतरी दुसराच घेऊन गेला. माझ्यासाठी मालिका जिंकणं महत्वाचं होतं.”

माझ्यामते संघाचा विजय हा सर्वात महत्वाचा आहे आणि वैयक्तीत रेकॉर्ड किंवा आकडेवारी ही फारशी महत्वाची नसल्याचं अजिंक्यने स्पष्ट केलं. अॅडलेड कसोटीत दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं मनोधैर्य खचलं होतं. त्यात अनेक खेळाडूंना झालेली दुखापत पाहता अजिंक्यने संघाची मोट उत्तम पद्धतीने बांधून भारताला विजय मिळून देत मालिका खिशात घातली होती. ज्यात ऑस्ट्रेलियाचा गॅबाचा गडही भारतीय संघाने उध्वस्त केला होता.

परंतू यानंतर झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्यची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. नुकतीच अजिंक्यची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली असून तो पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

Ranji Trophy : मुंबईच्या संघाची घोषणा, युवा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणार अजिंक्य रहाणे

    follow whatsapp