
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुख्यमंत्र्यांना पुस्तकं भेट दिली आहे. रात्री ७.५० ते ८.४० अशी ५० मिनिटं या तिघांची चर्चा झाली. या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरसंघचालकांची भेट घेतली.
२१ जूनला महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड करत आणि शिवसेनेच्या नेतृत्त्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे घेऊन जात आहोत असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी वारंवार म्हटलं आहे. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुमारे चारपेक्षा जास्त वेळा दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आहेत. आज त्यांनी आणि फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची दादर या ठिकाणी भेट घेतली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत असं एकनाथ शिंदे हे कायम सांगतात. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. भाजपच्या विचारधार संघातूनच ठरत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भेट ही महत्त्वाची मानली जाते आहे. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगण्यात येतं आहे. मात्र सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरीही विस्तार झालेला नाही. आता त्याबाबत या भेटीत काही चर्चा झाली का? हे सांगणं कठीण आहे. मात्र ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे यात काहीही शंका नाही.