नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं आज निधन झाले. नागपूरमधील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. अभ्यासु वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, संशोधक अशी त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन दोन मुली, जावई, बहीण, भाऊ आणि नातवंडं असा बराच मोठा परिवार आहे.
मनोहर म्हैसाळकर यांचं साहित्यात मोलाचं योगदान :
मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत होते. वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
शोक व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले ट्रोल :
दरम्यान, म्हैसाळकर यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली वाहिली मात्र त्यावेळी त्यांनी फोटो यशवंत मनोहर यांचा वापरला. नेटकऱ्यांनी त्यांना या चुकीची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट डिलीट करण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडेलवर फोटोशिवाय श्रद्धांजली वाहण्यात आली.
'मराठी वाङ्मयाच्या सेवेला वाहून घेतलेला उमदा साहित्यव्रती हरपला,' या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 14, 2022
मनोहर म्हैसाळकर यांचा परिचय
मनोहर म्हैसाळकर यांचा जन्म अमरावतीला झाला होता. बीकॉम पर्यंतच शिक्षण अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयमध्ये झाल्यानंतर ते नागपूरला काही काळ सोमलवार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी मॉइल मध्ये नोकरी केली आणि मॉइलमधून सेवानिवृत्ती झाले.
१९७२ साली त्यांचा विदर्भ साहित्य संघमध्ये प्रवेश झाला. १९८३ पर्यंत त्यांनी विविध पदे भूषविली. त्यानंतर १९८३ ते २००६ पर्यंत ते सरचिटणीस होते. २००६ ते आजपर्यंत त्यांनी विदर्भ साहित्य संघातचे अध्यक्ष पद भूषवलं. रंजन कला मंदिरामध्ये ते सक्रिय होते. रंजन कला मंदिरचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. त्यानंतर क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांनी काम केले. स्वरसाधना या संगीतसंस्थेमध्ये सुद्धा त्यांनी काम केले.
संगीत, क्रिकेट नाटक आणि तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यांमध्ये ते अग्रेसर होते. १९७२ पासून त्यांनी स्वतःला विदर्भ साहित्य संघ साठी वाहून घेतले होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ते ख्यातकीर्त होते. विदर्भ साहित्य संघ कार्यकर्त्यांच्या,साहित्यिकांच्या तीन पिढ्या त्यांनी घडवल्या.
विदर्भ साहित्य संघाने २००७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर आयोजित केले होते. यंदाचे हे वर्ष विदर्भ साहित्य संघाचे शतक महोत्सवी वर्ष आहे आणि शतक महोत्सवी वर्षाच्या या कार्यक्रमांमध्ये सातत्याने वेगळे असायचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प अनेक महत्त्वाच्या गोष्टी करायचे त्यांच्या मनामध्ये होते. विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या वास्तू पासून नवीन वास्तू पर्यंतच्या प्रवसाचे ते साक्षीदार होते. तसेच विदर्भ साहित्य संघाच्या हिरक महोत्सव, अमृत आणि शतक महोत्सवचे ते साक्षीदार होते.