सेनापती माझ्यापाठीमागे ठाम, पण सुभेदार कुठे आहेत? Pratap Sarnaik यांच्या आणखी एका पत्राने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका पत्रामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याची सूचना केली होती. यानंतर सरनाईक यांनी एका वृत्तपत्राच्या संपादकांना लिहीलेल्या पत्रात आपली खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.

केंद्र आणि राज्याच्या संघर्षात मी भरडला जातोय. एखाद्या युद्धात सैनिकाच्या मागे सेनापतीसह सर्व सुभेदार असणं आवश्यक आहे. सेनापती माझ्यामागे ठामपणे आहेत पण सुभेदार कुठे आहेत असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी पक्षांतर्गत खदखद पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. आपण मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्राचा लेटर बॉम्ब म्हणून प्रत्येकाने वेगळा अर्थ काढल्याचंही सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

एखादे युद्ध लढत असताना सैनिकांच्या मागे सेनापतीसह सुभेदार असणे आवश्यक आहे, तरच त्या सैनिकामध्ये लढण्याची जिद्द शेवटपर्यंत असते. आमचे सेनापती माझ्यामागे ठामपणे उभे आहेत पण सुभेदार कुठे आहेत? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी लढत असताना त्यांच्यामागे सर्व सहकारी, मंत्री त्यांच्यामागे होते. आम्ही देखील लढत आहोत, आम्हालाही सर्वांच्या पाठींब्याची अपेक्षा होती पण आम्हाला काही जण दिसलेच नाही असं म्हणत सरनाईक यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ईडी चौकशीदरम्यान शिवसेनेतील काही नेते सोडता महाराष्ट्र सरकारमधील कोणीही मदतीला पुढे आलं नसल्याचंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौत, शोभा डे यांच्याविरोधात मी भूमिका घेतली. अर्णब, कंगना यांच्याविरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. त्यामुळेच माझ्यामागे तपास यंत्रणा सक्रीय झाल्या असून यानंतरच चौकशीचा ससेमिरा लागला असल्याचं सर्वश्रुत असल्याचं सरनाईकांनी आपल्या पत्रात म्हटलंय. अन्वय नाईक यांचं प्रकरण मी आक्रमकपणे मांडल्यानंतर माझ्याविरुद्ध ईडी चौकशी सुरु झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात मी भरडला जात असून आपला राजकीय बळी दिला जात असल्याचंही सरनाईकांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे सरनाईकांच्या या पत्रावर शिवसेनेतून काय प्रतिक्रीया येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT