मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या चौकशीवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवला आहे. शुक्रवारी सकाळी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला. यानंतर रात्री हिरेन यांच्या मृतदेहावर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पोस्ट मार्टम करण्यात आलं. परंतू या पोस्ट मार्टमचा अहवाल अद्याप ठाणे पोलिसांनी जाहीर केलेला नाहीये. दरम्यान या अहवालाबद्दल महत्वाची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
NIA कडे तपास दिल्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही – संजय राऊत
हिरेन यांच्या मृतदेहावर Chemical Analysis होणं बाकी आहे. यासाठी काही नमुने कलिना येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत. हे Chemical Analysis झाल्याशिवाय पोस्ट मार्टम अहवालाबद्दल अधिक माहिती देता येणार नाही अशी माहिती ठाणे पोलिसांच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी दिली. नीता पाडवी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी कळवा हॉस्पिटलच्या HOD सोबत चर्चा करुन हा निर्णय घेतला.
दरम्यान हिरेन यांच्या परिवाराने जोपर्यंत पोस्ट मार्टम अहवाल पोलीस सादर करत नाही तोपर्यंत हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. ठाणे पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी हिरेन यांच्या परिवाराची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सर्व महत्वाच्या केसेस वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात?