Maha Vikas Aghadi : मविआ जागावाटपाची घोषणा का करत नाहीये? मुख्य कारण समोर

ऋत्विक भालेकर

16 Mar 2024 (अपडेटेड: 16 Mar 2024, 06:16 PM)

Lok Sabha Elections 2024 Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली, तरी महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप ठरलेले नाही. याबद्दल महत्त्वाचे अपडेट...

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

follow google news

Lok Sabha election 2024 Seats Sharing of Maha Vikas Aghadi : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीकडून जागावाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही. जागावाटपाचे घोडे कुठे अडले आहे, याबद्दल प्रमुख कारण आता समोर आले आहे. त्याबद्दल खुद्द संजय राऊत यांनी माहिती दिली. ते काय म्हणाले वाचा...

हे वाचलं का?

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल संजय राऊत म्हणाले, "यादी तयार आहे. जागावाटप जवळजवळ संपलेले आहे. आता काही मित्रपक्षाच्या जागांसंदर्भात त्याच्यावर शेवटची चर्चा होईल, आज उद्या. राहुल गांधी मुंबईत आहे. काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत. उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत. याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की ऑल इज वेल." 

उद्धव ठाकरेंची राजू शेट्टींनी का घेतली भेट?

ठाकरे-शेट्टी भेटीबद्दल राऊत म्हणाले, "राजू शेट्टी उद्धवजींना भेटले. मातोश्रीवर चर्चा केली. ती चर्चा फक्त एकाच मतदारसंघापुरती नव्हती. राजू शेट्टी यांनी एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा केली."

हेही वाचा >> तुमच्या लोकसभा मतदारसंघात कधी आहे मतदान?

"आमची भूमिका आहे की, राजू शेट्टींनाही या महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे सामावून घेता येईल. कारण त्यांच्या सारखे शेतकऱ्यांचे नेते संसदेत असायला पाहिजे. त्यांनी नक्कीच पाठिंबा मागितलेला आहे. त्याच्यावर आता उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.  

वंचित बहुजन आघाडीबरोबरचा पेच कुठे फसला?

वंचित बहुजन आघाडीबद्दल संजय राऊत यांनी सांगितले की, "आमची मनापासून इच्छा आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की, वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीमध्ये जे सामील झालेले आहेत. त्यांनी आमच्याबरोबर निवडणूक लढवावी. आमच्याकडून त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

राऊत पुढे म्हणाले की, "जेवढी आमची क्षमता त्यानुसार आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर जेव्हा बैठकीला आले, तेव्हाच आम्ही दिला. त्यांना आम्ही ज्या जागा दिलेल्या आहेत, त्या त्यांच्या यादीमध्ये होत्या. महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी मिळून लढायला हवे आणि मतविभागणी टाळायला हवी."

हेही वाचा >> मुंबईत 'या' दिवशी मतदान, मुंबईकरांनो पाहा तुमचा सगळा निवडणूक कार्यक्रम!

"बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा कुणी खेळखंडोबा करणार असेल, तर हा जो लढा आम्ही उभारलेला आहे, त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी केलं पाहिजे. कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत. आम्ही सगळे आहोतच. त्यामुळे जागा दुसरी, तिसरी यापेक्षा आपण सगळे एकत्र आहोत, हे प्रातिनिधिक का होईना दिसणे गरजेचे आहे. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर चर्चा होऊ शकते. म्हणून आम्ही जागावाटपाची घोषणा अद्याप केलेली नाही", असे सांगत राऊतांनी मविआच्या जागावाटपाची घोषणा न करण्याचे कारण सांगितले.  

कोल्हापूरची जागा काँग्रेसला... 

खासदार संजय राऊत म्हणाले की, "कोल्हापूरची जागा जिथे आमचा खासदार आहे, ती जागा आम्ही 30 वर्ष लढतोय. सातत्याने. तिथे आमचा खासदार आहे, तो पळून गेला, ते ठिक आहे. पण, खाली शिवसेना आहे. पण, छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान राखण्यासाठी ते काँग्रेसकडून लढणार असल्याने आम्ही ती जागा काँग्रेसला दिली आहे. त्याबदल्यामध्ये सांगलीची जागा मिळावी, अशी आमची भूमिका आहे. मला खात्री आहे की, जागावाटपात याचे प्रतिबिंब दिसेल", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

    follow whatsapp