महाराष्ट्रात उडणार निवडणुकांचा धुरळा; 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान!

मुंबई तक

• 01:01 PM • 09 Nov 2022

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने सध्या मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या जवळपास 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर यादरम्यान अर्ज भरण्याची मुदत असणार आहे, तर 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने सध्या मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या जवळपास 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर यादरम्यान अर्ज भरण्याची मुदत असणार आहे, तर 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हे वाचलं का?

यापूर्वी राज्यात जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या 2053 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 34 जिल्ह्यांमधील 340 तालुक्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

आयोगानं आदेशात म्हटल्याप्रमाणे ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होणार आहेत. तसंच थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याच्या तारखेपासून निकाल जाहीर होईपर्यंत या ग्रामपंचायतींच्या हद्दीत आचारसंहिता लागू राहणार आहे. या दरम्यान या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा मंत्री, खासदार, आमदार आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना कुठेही करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम :

  • तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दिनांक १८/११/२०२२ (शुक्रवार)

  • नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दिनांक २८/११/२०२२ सोमवार ते दिनांक ०२/१२/२०२२ (शुक्रवार) स.११.०० ते दु. ३.०० वा. पर्यंत

  • नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दिनांक ०५/१२/२०२२ (सोमवार) सकाळी ११.०० वा. पासून छाननी संपेपर्यंत.

  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दिनांक ०७/१२/२०२२ (बुधवार) वेळ – दुपारी ३.०० वा. पर्यंत

  • निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दिनांक ०७/१२/२०२२ (बुधवार) दुपारी ३.०० वा. नंतर

  • आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दिनांक १८/१२/२०२२(रविवार) स.७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा. पर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया जिल्हयांकरीता सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० वा. पर्यंत).

  • मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील – दिनांक २०/१२/२०२२ (मंगळवार)

  • जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम – दिनांक २३/१२/२०२२ (शुक्रवार) पर्यंत

    follow whatsapp