पालघर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर येत आहे. तब्बल २ महिन्याच्या तपासानंतर या प्रकरणात मिस्त्री यांच्या गाडीच्या तत्कालिन चालक डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी अनाहिता पंडोले यांचे पती डॅरियस पंडोल यांच्या जबाबानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर बेजबाबदारपणे वाहन चालविणे, सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी पळविणे, मानवी जीवाला धोका पोहचविणे या आरोपांच्या कलम 304(A) 279, 337, 338 आणि मोटार वाहन कायद्याच्या MVA – 112/183 ,184 या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांंनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला.
5 सप्टेंबर रोजी झाला होता अपघात :
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा 5 सप्टेंबर 2022 रोजी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यासह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांना देखील अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. हे दोघे गाडीत पाठीमागच्या सीटवर बसले होते. तर डॉक्टर अनाहिता पंडोल गाडी चालवत होत्या तर त्यांचे पती डॅरियस हे बाजूच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले होते. जहांगीर हे डॅरियस पंडोले यांचे लहान भाऊ होते.
मिस्त्री आणि पांडोले कुटुंबियांचे संबंध :
डॅरियस पंडोल यांचं सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबांशी अतिशय जवळचं नातं आहे. सायरस मिस्त्री यांचे ते बालमित्र आहेत. कॅथड्रॉल जॉन कॅनॉन स्कुलमध्ये दोघे एकत्र शिकले. डॅरियस पंडोले हे जे. एम फायनांशल प्रायव्हेट इक्यूटी या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय देखील होता. ड्यूक अँड सन्स लिमिटेडचं देखील काम पाहतात. डॅरियस यांनी यापूर्वी टाटा ग्लोबल बेव्हरेजेसच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर लगेचच डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पंडोले यांनी मिस्त्रींच्या हकालपट्टीच्या ठरावाच्या विरोधात मतदान केले होते.
अनाहिता पंडोल :
अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॉकलॉजिस्ट आहेत. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्या सेवा देतात. अनाहिता पांडोळे दीर्घकाळापासून ब्रीच कँडी हॉस्पिटलशी संबंधित आहेत. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्या मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल लोकांच्या कुटुंबातील महिलांचं बाळंतपण त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नावर नेहमी आवाज उठवला आहे.
मुंबईत लागणाऱ्या होर्डिंगच्या विरोधात देखील त्यांनी मोहीम उघडली होती. गेल्या आठवड्यातच त्यांनी बीएमसीला पत्र लिहून वेस्टर्न एक्सप्रेस हाय्व्हेलगत असणाऱ्या फुटपाथवर लागणाऱ्या होर्डिंग्जचा विरोध केला होता. पारशी समाजातील लोकसंख्येतील घट रोखण्यासाठी राबविलेल्या जिओ पारसी या उपक्रमाच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत.
ADVERTISEMENT