मुंबई: एकनाथ शिंदेंनी बंड करत शिनसेनेचे ३८ आमदार आपल्यासोबत अगोदर सुरतला नेले, त्यानंतर गुवाहटी आणि आता गोवा हे सर्व आमदार आपल्या मर्जीने आले असल्याचे स्पष्टीकरण स्वत: आमदारांनी दिले आहे. आज रात्री सर्व बंडखोर आमदार महाराष्ट्रात येणार आहेत. मागच्या काही काळात एकनाथ शिंदे यांचाच गट शिवसेना असल्याचे ते बोलत आहेत.
ADVERTISEMENT
परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेते पदावरुन काढले आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी निवड केली आहे. यानिवडीला एकनाथ शिंदे यांच्या गटाने थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. ११ जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यापुर्वी महाराष्ट्रात उद्या बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आदेश काढला आहे.
सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी काढलेल्या पत्रात काय म्हटले आहे?
”महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. रविवार दिनांक ३ जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेनेतर्फे राजन साळवी यांना नामनिर्देशीत करण्यात आहे. शिवसेना पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यांनी संपूर्ण वेळ विधानसभा सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनी मतदान करावे असा पक्षादेश आहे.” अशा आशयाचे पत्र सुनील प्रभू यांनी काढले आहे.
दरम्यान काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षातील सर्व पदावरुन काढले आहे. याबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले की शिंदे यांच्या विरोधात केलेली ही कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. ही कारवाईला लोकशाहीला शोभणारी नाही. याबाबत आम्ही त्यांना रितसर उत्तर देऊ.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. त्यांनी सांगितल्यावरच आम्ही उत्तर देऊ. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT