राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय; शिवसेना नेत्याचा पवारांवर निशाणा

मुंबई तक

• 06:51 AM • 21 Sep 2021

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सर्वच आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांची घुसमट होतं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यानंतर शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकेचा बाण डागला आहे. अनंत गिते काय म्हणाले? – […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत सर्वच आलबेल असल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांची घुसमट होतं असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यानंतर शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर टीकेचा बाण डागला आहे.

हे वाचलं का?

अनंत गिते काय म्हणाले?

– ‘राज्यात आपलं सरकार आहे. आपलं सरकार कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी हे काय आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे ना की शिवसेनेचं? सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. आपल्याला गाव सांभाळायचं आहे.’

-‘गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार करायचा नाही. फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. आघाडीत तीन घटक आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही काँग्रेस काँग्रेसच. कधी एकमेकांचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकांचं जमत का? यांची विचारांची सांगड बसतेय का? यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना कदापि होऊ शकत नाही. मूळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठित खंजीर खूपसून झाला आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विचाराचे होऊ शकत नाही.’

-‘आज तुम्हाला आदेश देणार आहे. जरी राज्यात आघाडी सरकार असलं, तरी आम्ही आघाडी सैनिक नाही. शिवसैनिकच राहणार आहोत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. दुसरा कुठलाही नेता मग त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत. त्याला कुणी जाणता राजा म्हणो… कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू फक्त बाळासाहेब ठाकरे!’

-‘ही सत्तेची तडजोड. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय? तुटावी असा मी काही शाप देत नाही. पण ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी आपल्याच घरी येणार ना? आपण शिवसेनेच्याच घरी येणार ना? बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या घरी येणार. मग आपलं घर टिकवायचं की नाही. आपलं घरं सांभाळायचं की नाही. आपलं घरं भक्कम करायचं की नाही.’

-‘तुम्हाला आघाडीचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचा गाव सांभाळायचा आहे. तुमची ग्रामपंचायत सांभाळायची आहे. तुमची जिल्हा परिषद सांभाळायची आहे. राज्यात काय करायचं ते नेते बघून घेतील. ते समर्थ आहेत बघायला. तुम्हाला मला चिंता करायचं कारण काय? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.’

    follow whatsapp