लोकशाही मूल्यांची ठाकरे सरकारने आज प्रेतयात्रा काढली-आशिष शेलार

मुस्तफा शेख

• 03:26 PM • 05 Jul 2021

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दिवस गाजला तो महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांवर केलेल्या वर्षभराच्या निलंबनाच्या कारवाईमुळे. पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस असणार आहे. या दिवशी काय होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र विधानसभेत आज जी कारवाई झाली त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून सातत्याने टीका होते आहे. भाजपच्या बारा […]

Mumbaitak
follow google news

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दिवस गाजला तो महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांवर केलेल्या वर्षभराच्या निलंबनाच्या कारवाईमुळे. पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं आहे. आता मंगळवारी अधिवेशनाचा दुसरा दिवस असणार आहे. या दिवशी काय होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मात्र विधानसभेत आज जी कारवाई झाली त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून सातत्याने टीका होते आहे. भाजपच्या बारा निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आपले निवेदन दिलं आणि या सरकारने केलेल्या मनमानीचा निषेध नोंदवला. तसंच आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका करत या सरकारने लोकशाहीच्या मूल्यांची अंत्ययात्रा काढली असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

हे वाचलं का?

बारा निलंबित आमदारांनी जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे. ‘विधानसभा सभागृहात ज्या पद्धतीने षडयंत्र रचलं गेलं आणि जे घडलंच नाही तो प्रकार रचण्यात आला. अशा गोष्टींचं भूत उभं करून भाजपच्या आम्हा बारा आमदारांना निलंबित करण्याचा कट राज्य सरकारने केला. या संपूर्ण घटनेची सत्य परिस्थिती आम्ही राज्यपालांना सांगितली आहे. आमच्यावर जे काही आरोप करून आमचं निलंबन केलं गेलं आहे त्याचा अहवाल राज्यपालांनी मागावा अशीही मागणी आम्ही केली आहे’ असंही आशिष शेलार यांनी सांगितलं.

आम्ही जनतेत आता अजून गतीने जाऊ हे सरकारने ठरवलं आहे. 12 आमदारांचं निलंबन का केलं आहे हे सुद्धा सरकारला स्पष्ट करावं लागेल. कारण हे ठरवून केलेलं आहे. काही सदस्य पीठासीन अधिकाऱ्यांच्या जवळही गेले नव्हते तरीही त्यांच्यावर कारवाई झाली आहे. ही लोकशीही मूल्यांची प्रेतयात्रा ठाकरे सरकारने काढली आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली असं सांगत हे प्रकरण असंसदीय असल्याने भाजपच्या बारा आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या बारा आमदारांचं निलंबन करण्याचा ठराव महाविकास आघाडी सरकारने एकमताने पास केला. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई अत्यंत चुकीची आहे असं सांगून या कारवाईचा निषेध करत सभात्याग केला. आता या प्रकरणाच पडसाद पूर्ण दिवसभर उमटताना दिसत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

आम्हाला ज्या गोष्टीची शंका होती ती शंका ठाकरे सरकारने खरी केली आहे. OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं. त्यामुळे सरकारने आमच्या आमदारांवर खोटा आरोप करून 12 आमदारांचं निलंबन केलं आहे. ओबीसी आमदारांसाठी 12 काय सगळ्या 106 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं तरीही चालेल. आम्ही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आम्ही मार्गी लावणारच अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    follow whatsapp