काँग्रेससमोर बंड रोखण्याचं आव्हान; सोनिया गांधी करणार गुलाम नबी आझादांसोबत चर्चा

मुंबई तक

• 10:33 AM • 18 Mar 2022

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस निवडणुकीत अपयशी ठरत असल्याचं वारंवार दिसून येत असून, यामुळे आता पक्षातंर्गत बंड उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेतृत्वावर पक्षातीलच नेत्यांकडून टीका होत असून, जी २३ गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हालचाली वाढल्या असून, काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी जी २३ गटातील नेते गुलाम […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस निवडणुकीत अपयशी ठरत असल्याचं वारंवार दिसून येत असून, यामुळे आता पक्षातंर्गत बंड उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेतृत्वावर पक्षातीलच नेत्यांकडून टीका होत असून, जी २३ गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हालचाली वाढल्या असून, काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी जी २३ गटातील नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा जी २३ गटाच्या नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यानंतर आता पाच राज्यातील निवडणुकीत सपाटून आपटल्यानंतर काँग्रेसमधील जी २३ गटाच्या नेते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. मागील दोन दिवसांत जी २३ गटाच्या नेत्यांच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्यातून अप्रत्यक्षपणे बंडखोरीचे संकेतच दिले जात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी दोन वेळा गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्याचबरोबर राहुल गांधी यांनीही जी २३ गटातील भूपेंद्र सिंह हुड्डा यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल ४५ मिनिटं चर्चा झाली.

काँग्रेसमधील बंडखोरीचे संकेत देणाऱ्या जी २३ गटाच्या नेत्यांच्या दोन दिवसात दोन बैठका पार पडल्या आहेत. गुलाम नबी आझाद यांच्या घरी झालेल्या बैठकीला काँग्रेस नेतृत्वावर थेट टीका करणारे कपिल सिब्बल, आनंद शर्मा, भूपेंद्र सिंह हुड्डा, शशी थरुर, एम.ए.खान, संदीप दीक्षित, विवेक तन्खा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मणिशंकर अय्यर यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते सहभागी होते.

जी २३ गटाचं म्हणणं काय?

बैठकीनंतर या नेत्यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी समविचारी पक्षाना सोबत घेऊन आघाडी करावी, असं या गटाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर काँग्रेसचं सूत्रे सर्वसमावेशक नेतृत्वाकडे दिली जावीत, असंही या गटाचं म्हणणं आहे.

पक्षातील काही नेत्यांनी बंडखोरीचा सूर लावताच काँग्रेस नेतृत्वाने या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोनिया गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा केली आहे. त्याचबरोबर सोनिया गांधी यांची कधीही गुलाम नबी आझाद यांच्यासोबत बैठक होऊ शकते, अशीही माहिती आहे.

सोनिया गांधी प्रत्येकासोबत चर्चा करण्यास तयार

जी २३ गटाच्या नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधल्यानंतर पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी बंडखोरीचा सूर लावणाऱ्या नेत्यांना फटकारलं आहे. त्याचबरोबर सर्वांशी चर्चा करण्यास सोनिया गांधी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे.

“सोनिया गांधी प्रत्येक काँग्रेस नेत्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे. जेव्हा एकत्र लढण्याची गरज आहे, तेव्हा काही राजकीय नेते पक्षाच्या विरोधात बोलत आहेत. त्यांचं म्हणणं योग्य आहे, तर ते सोनिया गांधींशी चर्चा करत नाही. जेव्हा या नेत्यांना यूपीए सरकारच्या काळात मंत्री बनवलं गेलं, तेव्हा लोकशाही पद्धतीने मंत्रिपद दिली गेली पाहिजे, असं हे नेते म्हणाले होते का? पक्ष उतार-चढावातून जातो, याचा अर्थ असा नाही की बंडखोरीचा पावित्रा घ्यावा,” असं ते म्हणालेले आहेत.

    follow whatsapp