Lata dinanath mangeshkar award : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका वादाचा विषय ठरली आहे. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव नसल्यानं महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी टीका केली. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनीही यावरून महाविकास आघाडीला सुनावलं आहे. त्यामुळे सध्या या वादावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.
ADVERTISEMENT
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीच्या चर्चेनंतर कार्यक्रमाच्या पत्रिकेची चर्चा सुरू झाली आहे. मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवर फक्त दोनच व्यक्तींची नावं होती.
एक होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरं नाव उषा मंगेशकर यांचं. या मुद्द्यावरून मंगेशकर कुटुंबियांवर आता टीका होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत टीका केली.
“लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळले. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे,” असं आव्हाड म्हणाले.
त्यानंतर इतरांनीही यावरून मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ट्विट केलं आहे. यात कायंदे यांनी म्हटलं आहे की, “लता दिदींवर मराठी माणसाने भरभरून प्रेम केलं. ठाकरे कुटुंब कायमच मंगेशकर कुटुंबाच्या पाठीशी राहिले. त्याच ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कार्यक्रम पत्रिकेत त्यांचं नाव न टाकून मंगेशकर कुटुंबाने मनाचा कोतेपणा दाखवला आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
रोहित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. “पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोघांनीही प्रत्येक कलेला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला.”
“आजच्या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार यांची उपस्थित असती, तर हा कार्यक्रम अधिक गोड दिसला असता,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार समारंभासाठी मुख्यमंत्र्याला आमंत्रण नव्हतं. प्रतिष्ठीत कार्यक्रमांपैकी हा कार्यक्रम होता म्हणून अप्रतिष्ठित माणसाला कार्यक्रमाला आमंत्रण देऊन कार्यक्रमाची उंची खाली आणायची नव्हती. कारणं अनेक आहेत, पण टोमणेबाज माणूस कार्यक्रमाला नको, हे घडलं,” अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांच्याबरोबरच भाजपचे नेते अतुल भातखकळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच निशाणा साधला आहे. “कोणीही उठून मंगेशकर कुटुंबियाबद्दल बोलवा, इतके वाईट दिवस आहेत. या कुटुंबाची उंची किती?आपली उंची किती? बोलतो किती?,” अशी टीका भातखळकरांनी आव्हाडांवर केली आहे.
कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव नसल्याचा मुद्दा आता सोशल मीडियातही चर्चिला जात आहे. अनेकांनी मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली आहे. तर हा मंगेशकर कुटुंबियांचा वैयक्तिक कार्यक्रम असल्याचं म्हणताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT