शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्या – सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला

मुंबई तक

• 04:12 AM • 19 Oct 2021

राज्यात NCB मार्फत सुरु असलेल्या ड्रग्ज धाडीवर सध्या राजकीय रणकंदन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर NCB ने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून NCB च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आपल्या जावयाजवळ सापडलेली वस्तू ही गांजा नसून तर हर्बल तंबाखू असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. मलिक यांच्या स्पष्टीकरणानंतर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत […]

Mumbaitak
follow google news

राज्यात NCB मार्फत सुरु असलेल्या ड्रग्ज धाडीवर सध्या राजकीय रणकंदन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर NCB ने कारवाई केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून NCB च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आपल्या जावयाजवळ सापडलेली वस्तू ही गांजा नसून तर हर्बल तंबाखू असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. मलिक यांच्या स्पष्टीकरणानंतर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी थेट NCP प्रमुख शरद पवारांना टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

शरद पवारांनी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्यावी. ज्याप्रमाणे नवाब मलिकांचा जावई श्रीमंत झाला तसा आपला शेतकरीही श्रीमंत होईल असं ट्विट खोत यांनी केलं आहे.

“पवार यांना जाणते राजे म्हटलं जातं. राज्यात मागील काही काळामध्ये महापूर, अतीवृष्टीमुळे शेतकरी कोलमडलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारकडे अशी विनंती केलीय की आमच्या शेतात गांजा लावायला परवानगी द्या, कारण शेती परवडत नाही,” असं खोत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तंबाखूच्या लागवडीसाठी बियाणं पुरवण्याची मागणी करणारं पत्रही सदाभाऊ खोतांनी पवारांना लिहीलं आहे.

“अलीकडच्या काळात ड्रग्सच्या प्रकरणामध्ये या राज्यातील ज्येष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे काहीतरी गांजा सापडला. पवार साहेब म्हणाले की ती हर्बल वनस्पतीयुक्त तंबाखू होती, म्हणून मी पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यात मी ती हर्बलयुक्त वनस्पतीपासून बनणारी तंबाखू आहे तिचं बियाणं कुठं मिळतं? त्याचं बियाणं आम्हाला तुम्ही उपलब्ध करुन द्या कारण तुम्ही आता त्याला मान्यता दिलीय. म्हणजे या राज्यातील शेतकरी आता त्याची पेरणी करेल. जसा यातून नवाब मलिक यांचा जावई श्रीमंत झाला तशी श्रीमंती राज्यातील शेतकऱ्याला येईल. त्यामुळे या राज्यातील शेतकरी चिंतामुक्त होईल.

मुख्यमंत्री सांगतात की मला शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आता संधी आलीय चिंतामुक्त करायची,” असं उपरोधिक पद्धतीचं स्पष्टीकरण या पत्राबद्दल बोलताना खोत यांनी दिलंय.

काँग्रेस राजवटीत आंदोलन करणाऱ्यांनो कोणत्या बिळात लपलात? वाढत्या इंधन दरांवरुन सेनेचा भाजपला चिमटा

    follow whatsapp