फक्त लालूंच्या रॅलीत गेल्याने शरद यादवांची खासदारकी गेली होती, एकनाथ शिंदेंचं काय होणार?

मुंबई तक

• 01:54 PM • 26 Jun 2022

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंड केले आहे. आपल्यासोबत ५० आमदार घेऊन गुवाहटीच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये बसले आहेत. दररोज एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर आमदारांनी आपले विलिनीकरण जर भाजप किंवा प्रहारमध्ये केले तरच त्यांची उमेदवारी वाचू शकते नाहीतर त्यांचं निलंबन ठरलेलं आहे अशी प्रतिक्रिया […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंड केले आहे. आपल्यासोबत ५० आमदार घेऊन गुवाहटीच्या रेडिसन्स ब्लू हॉटेलमध्ये बसले आहेत. दररोज एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटातील आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बंडखोर आमदारांनी आपले विलिनीकरण जर भाजप किंवा प्रहारमध्ये केले तरच त्यांची उमेदवारी वाचू शकते नाहीतर त्यांचं निलंबन ठरलेलं आहे अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे वकील देवदत्त कामत यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

देवदत्त कामत हे शिवसेनेचे वकील आहेत. खासदार अरविंद सावंत यांनी वकीलांनाच थेट समोर आणले आणि आपली बाजू मांडली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा होतीये ती शरद यादव यांच्या केसची. 2017 साली केवळ लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्याचा दाखला देखील कामत वकीलांनी दिला आहे. याच अनुषंगाने शरद यादव प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेऊया.

शरद यादव यांचं राज्यसभा सदस्यत्व झालं होतं रद्द

JDU चे नेते शरद यादव आणि अली अनवर यांचे 2017 मध्ये राज्यसभा सदस्यत्व गेले होते. या दोघांवरही कारवाई करायची म्हणून JDU ने थेट राज्यसभा सचिवालयाकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभानती व्यंकय्या नायडू यांनी दोघांचे सदस्यत्व रद्द केले. फक्त रॅलीत सहभागी झाल्याने शरद यादव यांचे सदस्यत्व केले होते, तर इथे एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कशी कारवाई होते हे पाहावं लागणार आहे.

निमित्त फक्त रॅलीत सहभागी व्हायचं होतं

नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यात 2017 मध्ये टोकाचा अंतर्गत कलह होता. नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षासोबत असलेली आघाडी तोडत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्याला शरद यादव यांनी विरोध केला होता. त्यानंतर पक्षाने लालू यादव यांच्या रॅलीत जाण्यासाठी शरद यादव यांना मनाई केली होती, परंतु शरद यादव रॅलीला गेलेच. शरद यादव यांनी मंचावरुन नितीश कुमार यांच्यावर टिकाही केली होती. यामुळेच JDU ने कारवाईची मागणी केली आणि शरद यादवांना आपली खासदारकी गमवावी लागली.

    follow whatsapp