राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील दोन प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातलं छुपं युद्ध काहीकेल्या थांबत नाहीये. पुणे ग्रामीण भागात दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिरुर येथील पाणी प्रश्नावरुन झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
ADVERTISEMENT
आपलं सरकार असूनही पाणी प्रश्नावर जर खोटे गुन्हे दाखल होणार असतील तर ही गंभीर बाब आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. “सरकार आपलं आलेलं असलं तरीही प्रश्न मात्र तेच आहेत. पाण्यासाठी खोटे गुन्हे दाखल होत आहेत. आधी म्हणलं जायचं की आपलं सरकार येऊ दे मग पाहून घेऊ. पण आपलं सरकार आल्यानंतरही जर पाणी प्रश्नासाठी खोटे गुन्हे दाखल होत असतील तर ही गंभीर बाब आहे. मी याबद्दल दिलीप वळसे पाटील आणि शरद पवारांशी बोलणार आहे”, असं आश्वास संजय राऊतांनी दिलं.
संजय राऊत पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. शिरुरमध्ये पाणी प्रश्नावर आंदोलन सुरु असताना दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघातील पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाठीमागून वार करण्याची शिवसेनेची परंपरा नाही, आम्ही समोरुन कोथळा काढतो – संजय राऊत
ADVERTISEMENT
