टिंगू-मिंगू लागलेत बढाया मारायला ! चिपी विमातळाच्या उद्घाटनावरुन Shivsena-BJP मध्ये जुंपली

मुंबई तक

• 12:45 PM • 08 Sep 2021

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात जुंपलेली पहायला मिळते आहे. ९ ऑक्टोबरला केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितलं. यावेळी उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांची गरज नसल्याचं वक्तव्य राणेंनी केल्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊतांनीही राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले होते नारायण राणे? […]

Mumbaitak
follow google news

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात जुंपलेली पहायला मिळते आहे. ९ ऑक्टोबरला केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितलं. यावेळी उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांची गरज नसल्याचं वक्तव्य राणेंनी केल्यामुळे शिवसेना खासदार विनायक राऊतांनीही राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

हे वाचलं का?

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाबाबतची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला येणार आहेत का? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते.

विनायक राऊतांचा पलटवार –

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती देत विनायक राऊतांनी निलेश आणि नितेश या दोन राणे बंधुंना टिंगू-मिंगू असं म्हटलं आहे. “बहुचर्चित चिपी विमानतळाची प्रतीक्षा सर्वांनाच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी चार बैठका घेतल्या. आपण वेळोवेळी चार हवाई वाहतूक मंत्र्यांशी सात वर्षांमध्ये वेळोवेळी चर्चा केली. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी अकरा वाजता फोनवर चर्चा केली. ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उदघाटन होणार आहे. साडेबारा वाजता मुंबईतून कोकणासाठी विमान उडेल. यासाठी संबंधित सर्व लोकांना मी २ सप्टेंबरलाच भेटलो. विमानतळ हे महाराष्ट्र एमआयडीसीचं आहे, केंद्र सरकार लायन्स देण्याचं काम करतंय. तुम्ही कोण सांगणारे? टिंगू-मिंगू कालपासून लागलेत बढाया मारायला.”

अडाणी मंत्री झाला हे आमचं दुर्दैवं –

यावेळी नारायण राणेंवरही विनायक राऊतांनी तोफ डागली. “नारायण राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. त्यांनी फुशारकी मारताना थोडे तरी भान ठेवावं. उद्घाटन करायला २२ वर्षे झाली. इतकी वर्षे राणे होते कोठे? आतापर्यंत फक्त १४% काम झाले होते. दिपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिला. मी स्वत: यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. बाप-बाप म्हणून मिरवणारा नितेश राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. ज्याला कायदा समजत नाही असा अडाणी मंत्री झाला हे आमचे दुर्दैव.” त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp