राज ठाकरेंची गोरेगावमधली सभा चांगलीच गाजली. एकीकडे गुजरात निवडणुका होत आहेत, त्यातच त्यांनी भाजपचे उमेदवार अल्पेश ठाकूर यांचं नाव घेतलं. अल्पेश ठाकूर यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. शिवाय भाजपनं त्यांना दिलेल्या उमेदवारीची आठवणही राज ठाकरेंनी करून दिली. पण, राज ठाकरे अल्पेश ठाकूरांचं नाव का घेतलंय? त्याचं मनसेच्या युतीसोबत काही कनेक्शन आहे का? राज ठाकरे भाजपला काय सूचवू पाहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या भाषणात आवर्जून कुठला उल्लेख?
राज ठाकरेंनी त्यांच्या उत्तर भारतीयांविरोधातल्या आंदोलनाबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगितली. हे आंदोलन महाराष्ट्रात आलेल्या उत्तर भारतीयांविरोधात होतं. पण, संपूर्ण युपी-बिहारविरोधात हे आंदोलन असल्याचं भासवलं गेलं, असं राज ठाकरे म्हणाले. आपली भूमिका, आपलं आंदोलन हे उत्तर प्रदेश किंवा बिहारविरोधात नाही हे राज ठाकरेंनी वारंवार भाजपला पटवून देताना दिसतात. चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंनी भेट घेतली होती त्यावेळीही राज ठाकरेंनी त्यांच्या एका जुन्या भाषणाची क्लीप ऐकवली होती. मनसेचं आंदोलन हे संपूर्ण युपी-बिहारविरोधात नसल्याचं पटवून दिलं होतं.
मनसे भाजप युतीतला अडथळा नेमकं कोण ठरतंय?
राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांविरोधातल्या भूमिकेमुळे त्यांना भाजपमधूनही विरोध झाला. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. त्यावेळी उत्तर प्रदेश भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी हा विरोध केला होता. मुंबई भाजपमधूनही हा विरोध झालेला पाहायला मिळाला. मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनीही राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर यांची माफी मागावी अशी मागणी केली होती. राज ठाकरेंना होणारा हा विरोध मनसे-भाजप युतीमधला अडथळा असल्याचं बोललं जातंय.
भाजप मनसेशी हात मिळवणीबाबत आस्ते कदमच्या भूमिकेत का?
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली तेव्हापासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या. मुंबई महापालिकेत ही युती होईल अशाही चर्चा रंगल्या. पण, मनसेसोबत युती नको, असा काही भाजप नेत्यांचा सूर असल्याचं बोललं गेलं. कारण काय? तर मुंबईत भाजपचा सर्वाधिक उत्तर भारतीय मतदार आहे आणि राज ठाकरेंनी आतापर्यंत उत्तर भारतीयांविरोधात जी भूमिका घेतली, त्यामुळे भाजपचा हा मतदार नाराज होऊ शकतो. इतकंच नाहीतर राज ठाकरेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्व मोदींवरही टीका केली. त्यामुळे भाजप मनसेसोबत करणार नाही, अशी चर्चा आहे.
अल्पेश ठाकूर यांची आठवण राज ठाकरेंनी का करून दिली?
आता राज ठाकरेंनी जो अल्पेश ठाकूर यांचा मुद्दा गोरेगावच्या सभेत मांडला, तो याचसाठी मांडला का प्रश्न आहे. म्हणजे, अल्पेश ठाकूर यांचं देशभर नाव गाजलं, ते गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे. 2018 च्या दरम्यान एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्य़ात आला, यामध्ये बिहारच्या तरुणाचं नाव समोर आलं आणि तिथून पुढे गुजरातमध्ये राहत असलेले अनेक बिहारी लोक अल्पेश ठाकूर यांच्या नजरेत आले. बिहारी लोक राहत असलेल्या अनेक वस्त्यांमध्ये हल्ले झाले, अनेक बिहारी तरुणांना मारहाण झाली, या सगळ्याचा आरोप झाला तो अल्पेश ठाकुर यांच्यावर… शिवाय, ज्या अल्पेश ठाकुरांनी उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतली, ज्या अल्पेश ठाकुरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती, त्याच अल्पेश ठाकुरांना 2022 मध्ये गुजरात निवडणुकीत भाजपनं तिकीट दिलंय. सध्या अल्पेश ठाकूर हे गांधीनगर दक्षिण विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आहेत.
मग, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेणारा आणि मोदींवर टीका करणाऱ्याला नेत्याला तुम्ही भाजपकडून तिकीट देताय, तो नेता तुम्हाला चालतो आणि आमच्यासोबत युती का चालत नाही? आमच्यासोबतच्या युतीची चर्चा का लांबली? असं राज ठाकरे यामधून सूचवू पाहतायत का? भाजपला युतीची आठवण करून देण्यासाठी राज ठाकरेंनी अल्पेश ठाकूर यांचं नाव घेतलं का? असंही आता बोललं जातंय.
ADVERTISEMENT