मुंबई: मुंबईतील मालाडच्या कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्मणनगर परिसरात एका पतीने आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पतीनेही फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. आरोपी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची स्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तर पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना काल (20 जानेवारी) रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. पती तानाजी कांबळे (वय 30 वर्ष) याने आपली पत्नी शितल कांबळे ( वय 25 वर्ष) हिला आपल्या घरी लक्ष्मणनगर येथे भेटण्यासाठी बोलावलं होतं. जेव्हा शितल येथे पोहचली तेव्हा पती तानाजीसोबत तिचा जोरदार वाद झाला.
दोघांमधील हा वाद एवढा टोकाला पोहचला की, तानाजीने घरातील चाकून थेट शितलच्या पोटातच वार केले. तब्बल 4-5 वार केल्यानंतर शितल जमिनीवरच रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. या हल्ल्यात शितलचा जागीच मृत्यू झाला. शितलचा मृत्यू झाल्याने घाबरलेल्या तानाजीने देखील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, तानाजीच्या शेजाऱ्यांना तो खिडकीतून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ते दृश्य पाहून शेजारी देखील हादरुन गेले आणि त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून तानाजीच्या गळ्यातील फास काढून त्याला खाली उतरवलं.
धक्कादायक! औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला
यावेळी तानाजी जिवंत असल्याचं आढळून आल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ नजीकच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यांची प्रकृतीत अत्यंत नाजूक झाली आहे.
या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांनी माहिती देताना सांगितलं की, कांबळे पती-पत्नी हे जवळजवळ 6 महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते. शितल ही आपल्या माहेरी म्हणजे आईजवळच राहत होती. 4 वर्षांपूर्वी शितल आणि तानाजी यांचं लग्न झालं होतं. पण त्यांना अपत्य होत नव्हतं. याच कारणामुळे दोघांमध्ये सातत्याने वादही सुरु होते. याच वादातून पत्नी शितलची हत्या करुन पती तानाजी याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT