MNS: 'माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल?', गणपत गायकवाड गोळीबारावर राज ठाकरे 'असं' का बोलले?

मुंबई तक

24 Feb 2024 (अपडेटेड: 24 Feb 2024, 05:57 PM)

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणावर बोलताना एक सूचक असं विधान केलं आहे. पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले.

follow google news

Raj Thackeray on Ganpat Gaikwad Firing: डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत. याचनिमित्त डोंबिवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबावर एक मोठं विधान केलं आहे. ज्याचा रोख थेट आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद हा डोंबिवलीत पाहायला मिळू शकतो. (mns why did raj thackeray say on Ganpat Gaikwad firing caseindicative statement about chief minister eknath shinde)

'गणपत गायकवाडांना गोळीबार करण्याची स्थितीपर्यंत कोणी आणलं?'

पत्रकार परिषदेत जेव्हा राज ठाकरे यांना भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराबाबत जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'मला असं वाटतं गणपत गायकवाड... एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल? हे पण मला वाटतं तपासलं पाहिजे.. इथपर्यंत तो माणूस जातो की, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली? याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.. कोर्टामध्ये ती होईलच.' असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले गंभीर आरोप 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर  गोळीबार केल्यानंतर जाहीर कबुली देताना म्हटलेलं की, 'पोलीस ठाण्याच्या दरवाज्यात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील. आमच्या सारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे.'

हे ही वाचा>> Uddhav Thackeray : ‘मिंधेंनीच मला गुंड बनवलं’, ठाकरेंची CM शिंदेंवर तोफ; गोळीबारावर काय बोलले?

'मी स्वत: गोळी झाडली. मला काही पश्चात्ताप नाही. कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार?'

'मी त्यांना जीवे मारणार नव्हतो. पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत. त्यांनी दुसऱ्याचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे.' ,अशी कबुली गणपत गायकवाड यांनी दिली होती.

त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेल्या विधानमुळे देखील या प्रकरणाला आता कल्याण-डोंबिवलीत अधिक हवा मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण मतदारसंघाचे खासदार म्हणून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. सध्या राज्यात भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. मात्र, असं असलं तरीही कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंविरोधात सर्वपक्षीय विरोधक हे एकवटले आहेत.

हे ही वाचा>> मुंबईलाही लाजवेल असा ठाण्याचा रक्तरंजित राजकीय गुन्हेगारीचा इतिहास!

कल्याण मतदारसंघात भाजपसोबतच मनसेचे नेते देखील श्रीकांत शिंदेविरोधात डावपेच आखत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक ही श्रीकांत शिंदेंसाठी नक्कीच सोपी असणार नाही. 

    follow whatsapp