मुंबईलाही लाजवेल असा ठाण्याचा रक्तरंजित राजकीय गुन्हेगारीचा इतिहास!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ठाण्यातील राजकीय गुन्हेगारीचा इतिहास
Thane crime Politics
social share
google news

Thane Political Crime: ठाणे: पुण्यातील मुळशी पॅटर्न, नाशिक, संभाजीनगर किंवा नागपुरातील टोळीयुद्धाच्या अनेक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे, छोटा राजन, हाजी मस्तान, सुलतान मिर्झा किंवा छोटा शकील. अशा अनेक गुंडांच्या रक्तरंजित कहाण्या आणि भाईगिरीच्या बातम्या ऐकत एक पिढी मोठी झाली आहे. जमीन, संपत्ती, पैसा, शराब किंवा शबाबच्या मोहातून गुन्हेगारांनी अनेकांच्या सर्रासपणे हत्या करण्यात केल्या आहेत. शहरी भागांसह ग्रामीण भागांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धात एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे निर्घृण आणि निर्दयीपणे हत्यांच सत्रं. (history of bloody political crime in thane district is worse than mumbai ganpat gaikwad firing case)

हत्यांसाठी गुंड कुप्रसिद्धच, परंतु आता माणसं संपवण्याच्या बाबतीत राजकारणीही काही मागे राहिलेले नाहीत. मुंबईच्या उपनगरांमध्ये काही गुंडांनी कोट्यवधींच्या सुपाऱ्या घेत 'व्हाईट कॉलर' नेत्यांचा गेम केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. परंतु राजकीय शर्यतीत पदांसाठी, वर्चस्वासाठी हत्याकांडांच्या घटनांचा एक मोठा इतिहास महाराष्ट्राला राहिलेला आहे. कल्याणमधील गोळीबाराच्या घटनेने मुंबईच्या उपनगरांमधील राजकीय गुन्हेगारीचा नवा पॅटर्न अधोरेखित झाला आहे. कधी-काळी सांस्कृतिक ऐश्वर्यासाठी प्रसिद्ध असणारा मराठमोळा ठाणे जिल्हा हा 'गँगस्टर, भाईलोक आणि गुंडांचं ठाणं' कसं झालं?, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापुरात राजकीय कारणांमुळं कुणा-कुणाच्या हत्या झाल्या? याबाबत सविस्तर आणि तपशीलवार समजून घेऊया. 

ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेनेच्या दोन नेत्यांवर पोलीस ठाण्यातच तुफान गोळीबार केला. प्रामुख्याने जमिनीच्या आणि काहीअंशी राजकीय वैरातून ही घटना घडली असून सुदैवाने दोन्ही नेत्यांचा जीव वाचला आहे. घटनेच्या काही तासांतच मुख्यमंत्री शिंदेंनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांना अटकही केली. परंतु आरोपीने थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत प्रकरणाला नवं वळण देण्याचा प्रयत्न केला. गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गायकवाड प्रकरण ताजं असलं तरी ते नवं नाही. यापूर्वी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापुरात मोठं हत्यांचं सत्र महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे.

2001 साली कल्याणचे नगरसेवक श्रीधर म्हात्रे यांची अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केल्यामुळं ठाणे जिल्हा हादरलेला. 2007 साली शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर तर 2023 मध्ये ठाकरे गटाचे नेते हर्षवर्धन पालांडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. 

ADVERTISEMENT

उल्हासनगर, अंबरनाथमध्ये राजकीय हत्या

कल्याणच्या गुन्हेगारीचा इतिहास आणि आताचं गायकवाड प्रकरण पाहता हे सगळं इतक्यात थांबण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. गुन्हेगारीत फक्त कल्याणच पुढेय का?, तर नाही. 2012 साली भिवंडीत दिवसाढवळ्या एका समाजसेवकाची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात नगरसेवक सलीम कुरैशींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तर 2017 साली काँग्रेस नेते मनोज म्हात्रे यांची त्यांचाच पुतण्या प्रशांत म्हात्रेने निर्घृण हत्या केलेली. ठाण्यानंतर ज्या उल्हासनगरमध्ये झपाट्याने नागरिकरण वाढलं, त्याच उल्हासनगरमध्ये अंगाला काटा आणणाऱ्या हत्यांच्या घटनाही घडल्या आहेत.  

ADVERTISEMENT

1986 साली शिवसेनेचे नेते रमाकांत शहाडांची अज्ञात गुंडांनी हत्या केलेली, त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच १९८९ मध्ये माजी आमदार पप्पू कलानी यांच्या काकांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आलेला. 1990 साली भतीजा कुटुंबियातील दोन लोकांच्या हत्येने उल्हासनगर हादरलेलं. 1992 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मारोती जाधवांना अज्ञात आरोपींनी राजकीय वैरातून कायमचं संपवलेलं. 2000 साली महायुतीचं सरकार असताना शिवसेनेचे नेते गोपाळ राजवानी यांची अज्ञात लोकांनी हत्या केलेली.

उल्हासनगरमध्ये सुरू झालेल्या भाईगिरी आणि गुंडगिरीचा प्रभाव अंबरनाथसह बदलापुरमध्येही पाहायला मिळाला. राजकीय स्पर्धा आणि वर्चस्वातून 2002 साली रिपाई नेते नरेश गायकवाडांचा खून झालेला. तर 2009 साली नगरसेवक नेत्याचा भाचा समीर गोसावीला शहरातील गुंडांनी कायमचं संपवलेलं. पुढच्या दोनच वर्षांनी म्हणजेच 2011 साली अज्ञात लोकांनी माजी उपनगराध्यक्ष उमेश गुंजाळांची दिवसाढवळ्या हत्या केलेली. तर 2014 मध्ये सेनेचे नेते मोहन राऊत आणि 2020 साली मनसेचे नेते राकेश पाटील यांच्या हत्यांच्या घटनेने अंबरनाथ आणि बदलापुरातील राजकीय गुन्हेगारीने टोक गाठलं. गेल्या काही वर्षांत ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या हत्या झाल्या, याचे तपशील आपण पाहिलेत, परंतु याची कारणं तुम्हाला माहितीय का?, तर शहरीकरणात सामाजिक आणि राजकीय वर्चस्वातून नेत्यांनी गुंडांच्या मदतीने एकमेकांना कायमचं संपवण्याचे प्लॅन्स आखण्यास सुरुवात केली. 

एमआयडीसीतील अवैध अर्थकारण, संघटित गुन्हेगारी, रिक्षा आणि व्यापारी संघटन, पालिकेतील सत्ता आणि त्यातून मिळणारे कंत्राट घेण्यासाठी राजकीय नेते आणि कुख्यात गुंड एकमेकांच्या जीवावर उठले. मोजक्याच वर्षात मुंबईसह ठाणेलगतच्या जमिनींना आलेल्या सोन्याच्या भावामुळंही राजकीय गुंडांचं फावत गेलं. बक्कळ पैसा कमवणं, दहशतीत निर्माण करून विरोधकांना संपवणं असं काहीसं चित्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील उपनगरांमध्ये राहिल्याचं सांगितलं जातं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT