एकीकडे बीसीसीआय आयपीएलच्या चौदाव्या सिझनची तयारी सुरु करत असताना…मुंबईतील सामन्यांवर टांगती तलवार तयार झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काम करणाऱ्या ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. १० ते २५ एप्रिल दरम्यान मुंबईत आयपीएलच्या मॅच खेळवल्या जाणार आहेत, त्यातील १० मॅच या वानखेडे मैदानावर खेळवल्या जाणार आहेत. पण त्याआधीच वानखेडे मैदानावरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे ते दररोज ट्रेनने प्रवास करुन मुंबईत यायचे. या प्रकारानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या कर्मचाऱ्यांना मुंबईतच राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे सामने संपेपर्यंत या कर्मचाऱ्यांना मुंबईतच राहता यावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. देशात कोरोनाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने सर्व सामने हे प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारी केली आहे. असं असलं तरीही वानखेडे मैदानावरचे हे आठ कर्मचारी आणखी कोणाच्या संपर्कात आले होते याचा तपास सुरु आहे.
वादग्रस्त Umpire’s Call चा नियम कायम राहणार, DRS च्या नियमांमध्ये महत्वाचे बदल
मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडे मैदानावर काम करणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली होती. मार्च २६ ला आलेल्या रिपोर्टमध्ये त्यापैकी ३ जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला. यानंतर १ एप्रिल रोजी आलेल्या अहवालातही आणखी ५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. वानखेडे क्रिकेट स्टेडीयम हे भारतामधलं सर्वात महत्वाचं मैदान मानलं जातं. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्य सरकार लॉकडाउन लावण्याचा विचार करतंय. अशा परिस्थितीत वानखेडे मैदानावरील ८ कर्मचाऱ्यांना झालेली कोरोनाची लागण पाहता हे सामने दुसऱ्या ठिकाणी हलवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
ADVERTISEMENT
