टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात निराशाजनक सुरुवात केली. विराट कोहली आणि ऋषभ पंतचा अपवाद वगळता सर्व फलंदाजांनी आजच्या सामन्यात निराशा केली. भारताने या सामन्यात १५१ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा शून्यावर तर लोकेश राहुल तीन रन काढून माघारी परतला. शाहिन आफ्रिदीने भारताच्या दोन्ही ओपनर्सला माघारी धाडलं.
ADVERTISEMENT
परंतू नेहमीप्रमाणे या सामन्यालाही वादाची किनार लाभली आहे. ज्या बॉलवर शाहिन आफ्रिदीने राहुलला क्लिन बोल्ड केलं तो बॉल नो-बॉल असल्याचं टिव्ही रिप्लेमध्ये दिसून आलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी थर्ड अंपायरची ही मोठी चूक पकडली असून या निर्णयाविरुद्ध चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
टॉस जिंकून पाकिस्तानने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव हे झटपट माघारी परतले. परंतू यानंतर कर्णधार विराट कोहलीने सर्वात आधी ऋषभ पंतच्या साथीने आणि त्यानंतर जाडेजाच्या मदतीने महत्वाची इनिंग खेळत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि भारताच्या डावाला आकारही दिला. विराट ४९ बॉलमध्ये ५ फोर आणि १ सिक्स लगावत शाहिन आफ्रिदीच्या बॉलिंगवर ५७ रन्स काढून आऊट झाला.
पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने ३, हसन अलीने दोन तर शादाब खानने एक विकेट घेतली.
ADVERTISEMENT