Tokyo Paralympics : भारताची ‘सुवर्ण’ सकाळ! कृष्णा नागरची जबरदस्त कामगिरी

मुंबई तक

• 05:12 AM • 05 Sep 2021

टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवसाची सकाळ भारतासाठी सुवर्ण ठरली. बॅटमिंटनमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या कृष्णा नागरने जबरदस्त कामगिरी करत हाँगकाँगच्या के चू मान केई याचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रविवारी म्हणजे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीही भारताची घोडदौड कायम राहिली. भारताच्या सुहास यथिराजनं रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर कृष्णा नागरने भारताच्या खात्यात सुवर्ण […]

Mumbaitak
follow google news

टोकियो पॅरालिम्पिकच्या शेवटच्या दिवसाची सकाळ भारतासाठी सुवर्ण ठरली. बॅटमिंटनमध्ये भारताला दुसरं सुवर्ण पदक मिळालं. भारताच्या कृष्णा नागरने जबरदस्त कामगिरी करत हाँगकाँगच्या के चू मान केई याचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

हे वाचलं का?

रविवारी म्हणजे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीही भारताची घोडदौड कायम राहिली. भारताच्या सुहास यथिराजनं रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर कृष्णा नागरने भारताच्या खात्यात सुवर्ण पदक जमा केलं.

बॅटमिंटनमध्ये एसएच-6 प्रकारात कृष्णा नागरचा अंतिम फेरीत हाँगकाँगच्या के चू मान केईसोबत लढत झाली. तीन सेटमध्ये सामना रंगला. पहिला सेट भारताच्या कृष्णा नागरने 21-17 अशा फरकाने आपल्या नावे केला. तर दुसऱ्या सेटमध्ये के चू मान केईने वापसी केली.

के चू मान केईने दुसरा सेट 21-16 ने जिंकला. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये भारताच्या कृष्णाने पुन्हा वापसी केली. कृष्णाने तिसरा सेट 21-13 अशा फरकाने जिंकत सुवर्ण पदक पटकावलं.

यथिराजला ‘सुवर्ण’ पदकाची हुलकावणी; ‘रौप्य’ची कमाई

कृष्णाच्या सुवर्ण पदकाआधी सुहास यथिराजने भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. पुरूष एकेरीच्या बॅटमिंटन स्पर्धेत एसएल-4 अंतिम सामन्यात यथिराजला पराभव स्वीकारावा लागला. फ्रान्सच्या लुकास माजूरनं यथिराजचा पराभव केला.

बॅटमिंटन पुरूष एकेरीच्या एसएल-4 अंतिम सामन्यात सुहास यथिराजचा मुकाबला फ्रान्सच्या लुकास माजुरसोबत झाला. अंतिम सामना तीन सेटमध्ये झाला. पहिल्या सेटमध्ये सुहास यथिराजने जिंकला. मात्र, नंतरच्या दोन सेटमध्ये लुकास माजुरनं वापसी करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

भारताची सर्वोत्तम कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची एकूण 19 पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. 11 पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने 12 पदकं जिंकली आहेत. 5 सुवर्ण, 8 रौप्य व 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत 1968 पासून पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असून, 1976 व 1980 मध्ये भारत सहभागी झाला नव्हता.

    follow whatsapp