मुंबईची खबर: 10 मिनिटांच्या रस्त्यांसाठी पाऊण तास, भुयारी मेट्रो आली पण...
मुंबईतील तीन वांद्रे कुर्ला परिसरात (बीकेसी) भुयारी मेट्रो पोहोचली असली तरी या परिसरातील वाहतूक कोंडी कायमच पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीकेसी परिसरात भुयारी मेट्रो असली तरी वाहतूक कोंडी

साडेचार किमीसाठी पाऊण तास...

दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संतापजनक अनुभव
Mumbai News: मुंबईतील नागरिकांसाठी मेट्रोचा प्रवास सोयीस्कर वाटतो. आता मुंबईतील तीन वांद्रे कुर्ला परिसरात (बीकेसी) भुयारी मेट्रो पोहोचली असून ती नागरिकांसाठी दिलासा देणारी बाब ठरली. मात्र, मेट्रोच्या सुविधेमुळे सीप्झ परिसर आणि दक्षिणेकडील वरळीपर्यंत संलग्नता मिळाली असली तरी या परिसरातील वाहतूक कोंडी कायमच पाहायला मिळत आहे.
परिसरातील चौकाचे मुख्य रस्ते तसेच मेट्रो स्थानकाच्या मागील पर्यायी रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
खरंतर बीकेसीचा परिसर हा देशाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखला जातो. विविध कंपन्या, बँक आणि आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर असल्यामुळे नेहमीच बीकेसीच्या परिसरात लाखो लोकांची वर्दळ पाहायला मिळते. या परिसरात भूमिगत मेट्रो पोहचल्यामुळे वाहनांच्या कोंडीवर नियंत्रण मिळवता येईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, भुयारी मेट्रोची सुविधा उपलब्ध झाली असून सुद्धा या परिसरात भीषण वाहतूक कोंडी असल्यामुळे बीकेसीचा प्रवास म्हणजेच तासाभराचा विलंब असाच नागरिकांचा समज होत आहे.
अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची वर्दळ
बीकेसी परिसराच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची कोंडी पाहायला मिळतेच. परंतु, याव्यतिरिक्त परिसरातील अंतर्गत रस्ते सुद्धा वाहनांनी भरुन जात असल्याचं पाहायला मिळतं. खरंतर, बीकेसी मेट्रो स्थानकाला जोडून एमएमआरडीएच्या जेतवन बिल्डिंगच्या समोरुन एक रस्ता थेट कुटुंब न्यायालयाच्या चौकात येतो. या रस्त्यावर कॉर्पोरेट टॉवर, रेल कॉर्पोरेशन तसेच एमएमआरडीए मुख्यालय आहे. मात्र अंतर्गत रस्ता असून सुद्धा संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळते.
हे ही वाचा: वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटलं, चिमुकलीवर बाजूला नेत अत्याचार, दौंडमध्ये संताप
कुटुंब न्यायालय चौक ते एमटीएनएल मार्ग
बीकेसीमधील कुटुंब न्यायालय चौक ते एमटीएनएल मार्गावर वाहनांची कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतं. खरंतर हे अंतर साडेचार किमी असून बऱ्याचदा विशेषत: संध्याकाळच्या वेळेत कुटुंब न्यायालय चौक ते एमटीएनएल पर्यंत अंतर पार करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तर जास्तीत जास्त 45 ते 50 मिनिटे कालावधी लागतो.
एलबीएस रस्त्याला जोडणारा उड्डाणपूल एलबीएसला उतरुन पुढे हा रस्ता कुर्ला पश्चिममार्गे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडला जातो. त्यावेळी या रस्त्यावर सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील कलिनाकडील उड्डाणपुलासह, हंसभुर्गा मार्गाकडील वाहतूक येऊन मिळते. त्यामुळे कुर्ला पश्चिम, एलबीएस भागात थेट लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पुढच्या पुलापर्यंत मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. संध्याकाळच्या वेळेत हा रस्ता पार करण्यासाठी दीड तास लागत असल्याचं वाहनचालकांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा: काकीचं पुतण्यावर कसं जडलं प्रेम? काका म्हणाला, 'तो रोज घरी यायचा आणि...', वाचा Inside स्टोरी
दररोज प्रवास करणाऱ्यांचा अनुभव
तसेच, दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मते, संध्याकाळी घरी परतत असताना पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा बीकेसी-मानखुर्द कनेक्टर सुद्धा वाहतूक कोंडीत सापडत असल्याचा अनुभव पाहायला मिळतो.