नागपूर: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (11 मार्च) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यात जवळजवळ 30 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल (10 मार्च) संध्याकाळी संपलं. दरम्यान, आज भल्या सकाळी नागपूरमध्ये जाऊन फडणवीसांनी मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, ही भेट नेमकी का घेण्यात आली होती आणि यावेळी काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्याच आहे.
दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, ‘राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक ठरेल.’ त्यामुळे भाजप पुढील 3 महिन्यात परत सत्तेत येणार असल्याचं सूतोवाच मुनगंटीवार यांनी केलं आहे.
मोहन भागवतांनी घेतली मिथुनदांची भेट, बंद खोलीत काय झाली चर्चा?
नुकतंच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला विरोधी पक्षाने घेरून बॅकफूटवर नेलं. यावेळी सभागृहात फडणवीस आणि विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरुन सरकारला बऱ्याचदा अडचणीत आणलं.
असं असताना अधिवेशन संपताच फडणवीसांनी सरसंघचालकाची दुसऱ्याच दिवशी भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे ही भेट आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात तर नाही ना? अशी देखील चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपकडून सातत्याने हा दावा करण्यात येत आहे की, हे सरकार अल्पावधीतच कोसळेल. मात्र, अद्याप तरी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी तसं काही होऊ दिलेलं नाही.
दुसरीकडे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी असा देखील आरोप केला होता की, भाजपने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा केला. मात्र, आमचं सरकार मजबूत असून पुढील पाच वर्ष टिकेल.
यामुळे आता फडणवीसांनी मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात काही नव्या घडामोडी घडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.