Pune Rain : अंदाज चुकला अन्…; मुठा नदीपात्रालगत मोठी दुर्घटना टळली, पाच जणांना जीवदान

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pune Rain news : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रात सद्यस्थितीला १३ हजार ९८१ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. दरम्यान, आज मध्यरात्री (११ ऑगस्ट) मुठा नदीपात्रा लगत असलेल्या रस्त्यावरून जाणार्‍या चारचाकी गाडीच्या चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं गाडी पाण्याचा प्रवाहात वाहून जात होती. मात्र, वेळीच मदत मिळाल्यानं कारमधील पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आलं.

पुणे शहरासह परिसरात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. सद्यस्थितीत चार धरणं ९६ टक्के भरली आहेत. २७.९९ टीएमसी इतका उपलब्ध पाणीसाठा धरणात आहे.

खडकवासला धरणातून १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे

या पार्श्वभूमीवर गुरुवारी (११ ऑगस्ट) सकाळपासून खडकवासला धरणातून १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यात दिवसभरात वाढ करण्यात आली. संध्याकाळपर्यंत २६ हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू होता. रात्री तो कमी करून विसर्ग २२ हजार क्युसेक करण्यात आला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, मुठा नदीपात्रा लगत लावण्यात आलेल्या चार चाकी गाड्या अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात रात्री पावणे दोनच्या सुमारास एस.एम. जोशी पुलाखालील नदी पात्राच्या रस्त्यावरून कुणाल लालवाणी हे कुटुंबियांसमवेत एरंडवणा येथील नातेवाईकाकडे कारमधून जात होते.

जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची गाडी पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली. या घटनेची माहिती अग्निशामक विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळताच, काही मिनिटांत घटनास्थळी अग्निशामक विभागाचे कर्मचारी आणि पोलीस दाखल झाले.

ADVERTISEMENT

त्यांनी दोरीच्या सहाय्याने कारपर्यंत पोहोचून त्यांना सुखरूप बाहेर काढलं. वंचिका लालवाणी (वय 13), प्रिया लालवाणी (वय 22), कुणाल लालवाणी (वय 28),कपिल लालवाणी (वय 21) आणि कृष्णा लालवाणी (वय 8) अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावं असून, सर्व मूळचे पालघर येथील आहेत.

ADVERTISEMENT

पावसाचा जोर कमी झाल्यानं विसर्ग कमी

पुणे शहरासह खडकवासला पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढला होता. त्यामुळे धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. मात्र, पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं आज पहाटे ४ वाजता १३ हजार ९८१ क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT