Kolhapur Bypoll: भाजपने कोल्हापुरातून सत्यजित कदम यांनाच तिकीट का दिलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर: ‘कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनं लढवणार आणि जिंकणारही आहे.’ असा दावा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्यावतीनं माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक 12 एप्रिल रोजी होत असून त्यासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (18 फेब्रुवारी) कोल्हापुरात शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूर उत्तरची निवडणूक भारतीय जनता पक्ष लढवणार आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भाजपकडून त्यांनी ही निवडणूक लढवावी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांना पाठिंबा देत बिनविरोध विजयी करावं असा प्रस्ताव भाजपनं दिला होता. पण तो मान्य करण्यात आला नाही. असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुले आता भाजप ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष श्रेष्ठींकडे कोल्हापुरातील माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि महेश जाधव यांची नावं पाठवली आहेत. मात्र प्रदेश भाजपनं सत्यजित कदम यांच्या नावाला प्रथम पसंती दिली आहे. असं जाहीर केलं .

भाजप या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासह राज्यपातळीवरील प्रमुख नेत्यांच्या सभा होणार असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं जो प्रचाराचा पॅटर्न वापरला. तोच पॅटर्न कोल्हापुरातही वापरला जाईल, विकासाच्या मुद्द्यावर प्रचारात जास्त भर असेल. असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र भाजप प्रदेशनं सत्यजित कदम यांच्याच नावाची शिफारस कोअर कमिटीकड केली असल्याची माहिती पाटील यांनी दिल्यामुळे कोअर कमिटीची मान्यतेची मोहर कदम यांच्याच नावावर उमटणार हे आता निश्चित झालं आहे. आज कोअर कमिटीकडून कदम यांच्या अधिकृत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान भाजपकडून या पोटनिवडणुकीत मिळालेल्या संधीचं आपण सोनं करून दाखवू. तसंच पक्षानं दाखवलेला विश्वासही सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया सत्यजित कदम यांनी व्यक्त केली आहे.

कोण आहेत सत्यजीत कदम?

सत्यजित कदम हे कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजी कदम यांचे पुत्र आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या परिवारातील ते जवळचे नातेवाईक आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद, भाजप व ताराराणी आघाडीचे नगरसेवक, गटनेते प्रमुख म्हणून कदम यांनी शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे.

यापूर्वी 2014 साली विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळेला त्यांना जवळपास 47 हजार 315 मतं मिळाली होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना जरी रंगत असला तरी आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे मात्र नक्की.

‘ही महाविकास आघाडीची दिवा विझण्यापूर्वीची ही फडफड’

‘महाराष्ट्रात भाजपला आपण पुन्हा सत्तेवर येऊ देत नाही, घाबरु नका.’ असे वक्तव्य खासदार शरद पवार यांनी नुकतंच केलं आहे. याबद्दल जेव्हा चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा ते असं म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकार आता पूर्णपणे घाबरलं असल्याचं दिसून येतंय. खासदार संजय राऊत हे सुध्दा भाजपबद्दल करत असलेल्या विधानाकडं आपण लक्ष देत नाही . दिवा विझण्यापूर्वीची ही फडफड आहे.’ असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

‘कायदेशीर कारवाई झालेल्या नामदार नवाब मलिक यांचं पालकमंत्री पद काढून घेण्याचं आघाडी सरकारनं ठरवलं. पण त्याऐवजी त्यांचं मंत्रीपदच काढून घेणं आवश्यक आहे आणि भाजपची ही मागणी कायम असेल.’ असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूर : शिवसेनेनं बालेकिल्लाच दिला ‘काँग्रेस’ला; भाजपला होणार फायदा?

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा कारभार पूर्णपणे निराशाजनक झाला आहे. शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाचा प्रश्न, मराठा आणि ओबीसी आरक्षण, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासह विविध 13 मुद्द्यांवर सोमवारी आपण आघाडी सरकारच्या विरोधात सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडणार आहे अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT