Politics of Maharashtra : अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे BJP ची पोलखोल?
राष्ट्रवादी सोबत कधीच जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या आधी सांगत असताना निवडणुकांनंतर भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा कसा अनेकवेळा प्रयत्न केला हे खुद्द अजित पवारांनीच सांगितले.
ADVERTISEMENT

Politics Of Maharashtra : अजित पवारांच्या बंडाच्या बातम्या महिन्याभरापासून सुरु होत्या. अजित पवारांनी या बातम्यांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आपणच राष्ट्रवादी पक्ष आहे असा दावा देखील त्यांना केला आहे. आता राष्ट्रवादी कोणाची हा वाद शिवसेनेप्रमाणे निवडणुक आयोग आणि कोर्टात जाण्याची शक्यता आहे. पण, यात एक मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे अजित पवार, हसन मुश्रीफ आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपने केलेल्या आरोपांचा…
बुधवारी अजित पवारांनी मुंबईत केलेल्या भाषणात पवारांवर आरोप केलेच त्याचबरोबर भाजपसोबत कशा प्रकारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला हे देखील सांगितलं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला नॅचरली करप्ट पार्टी असं संबोधलं तर दुसरीकडे किरीट सोमय्यांपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. आता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबतच भाजपने सरकार स्थापन करण्याचा कसा प्रयत्न केला होता हेच पाहुयात.
वाचा >> जरंडेश्वर प्रकरण : अजित पवारांचा उल्लेख, पीएमएलए कोर्टांचं गंभीर निरीक्षण
अजित पवारांनी एमईटी येथे झालेल्या सभेत जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीच्या इतिहासापासून अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्याचबरोबर त्यांच्या मनातली खदखद देखील व्यक्त केली. ‘मला लोकांसमोर व्हिलन का ठरवलं जातं?’ असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
खात्यांबद्दल झाली होती चर्चा
एकीकडे राष्ट्रवादी सोबत कधीच जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस निवडणुकांच्या आधी सांगत असताना निवडणुकांनंतर भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा कसा अनेकवेळा प्रयत्न केला हे खुद्द अजित पवारांनीच सांगितले. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार २०१७ ला भाजप आणि राष्ट्रावादी सरकार स्थापन करणार होते. त्यासाठी सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील हे राष्ट्रवादीकडून तर सुधिर मुनगुंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील असे वर्षावर चर्चेसाठी होते. कुठली खाती कुठली मंत्रीपद द्यायची याबाबत देखील चर्चा झाली होती.










