शिवसेनेचा दसरा मेळावा राज ठाकरे हायजॅक करणार? महाराष्ट्र सैनिकाच्या पत्रामुळे चर्चा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या राज्यात गणेश उत्सव हा आनंद आणि उत्साह तसंच नवचैतन्य घेऊन आला आहे. अशात गणपतीच्या निमित्ताने राजकीय गाठीभेटीही घेतल्या जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दिग्गज भाजप नेते येऊन गेले आहेत. गुरूवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या घरी आलेल्या गणपतीचं दर्शन घेतलं. याच गणेश उत्सवात चर्चा सुरू झाली आहे ती दसरा मेळाव्याची. तसंच मनसैनिकांची भावना समोर आल्याने आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार का या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र सैनिकाची भूमिका मांडणारं पत्र पोस्ट केलं आहे

आदरणीय साहेब,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सविनय जय महाराष्ट्र!

वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ ‘एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रोते’ हा चमत्कार अवघ्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच, आपल्या शिवतीर्थावर! दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदसम्राटांकडून मिळालेलं राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचं ‘बाळकडू’- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत.

ADVERTISEMENT

दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतकं सगळं करूनही स्वत:चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.

ADVERTISEMENT

दसरा मेळावा चेष्टेचा विषय ठरतोय

एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता “कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार” असं म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर’ असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा-मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?

वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे.

दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक ‘ठाकरी’ शैलीतील वक्तृत्वाच्या तेजःपुंज आविष्काराची – “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पहात आहेत.

धन्यवाद

आपला नम्र,

महाराष्ट्र सैनिक.

राज्यात गणेश उत्सव अजूनही सुरू आहे. त्याचप्रमाणे राजकीय भेटीगाठीही सुरू आहेत. अमित शाह हे मुंबईत आल्यानंतर राज ठाकरेंची भेट घेणार असल्याच्याही चर्चा आहेत. अशात राज ठाकरेंना हे आवाहन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मीच पुढे नेतो आहे असं राज ठाकरेंनी नुकतंच एका भाषणात सांगितलं. आता महाराष्ट्र सैनिकाची ही साद राज ठाकरे ऐकणार का आणि दसरा मेळावा शिवसेनेकडून हायजॅक करणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

संदीप देशपांडेचं ३० ऑगस्टचं ट्विटही चर्चेत

‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT