Mahadev Belpatra Dhatura reason : ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला प्रिय मानले जाणारे बेलपत्र, धोतऱ्याचं फुल यांसारखी वनस्पती केवळ तोडून अर्पण केल्याने ते प्रसन्न होत नाही. या पवित्र वनस्पतींची लागवड करून आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेऊनच महादेवाची खरी कृपादृष्टी प्राप्त होते, असे ज्योतिष शास्त्रातील जाणकार सांगतात.
ADVERTISEMENT
आजच्या काळात अनेक जण झाडे लावण्यापेक्षा त्यांची पाने, फुले तोडून देवाला अर्पण करण्यात अधिक उत्सुक दिसतात. परिणामी, पूर्वी रानटी समजली जाणारी धोतऱ्यासारखी ही झाडेसुद्धा आता शहरांसह ग्रामीण भागात सहज दिसेनाशी झाली आहेत. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील सोमवारी बेलपत्रांच्या पूर्ण फांद्या तोडल्या जातात. मंदिरांच्या बाहेर बेलपत्र, धोतऱ्याच्या फुलांच्या किमती गगनाला भिडतात. ही परिस्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक मानली जात आहे.
धार्मिक श्रद्धा व्यक्त करताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक आहे. शिवशक्ती ही पुरुष आणि प्रकृतीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडत्या वनस्पतींचे संवर्धन करणे, नवीन रोपे लावणे आणि परिसर हिरवागार ठेवण्याचा संकल्प करणे अधिक महत्त्वाचे ठरते. महादेवाच्या पूजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भाव. पूजनसामग्री विपुल असली तरी भावनाशून्य पूजा निरर्थक ठरते; परंतु खऱ्या भक्तिभावाने केलेली साधी पूजा देखील महादेवाला प्रिय असते.
हेही वाचा : कोल्हापूर : हॉटेल स्वस्तिकची तोडफोड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी दिला भर रस्त्यात चोप.., पाहा व्हिडीओ
बेलपत्र हे सृष्टीतील तीन गुणांचे रज, सत्त्व आणि तम प्रतीक मानले जाते. रज हा सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचा, सत्त्व हा पालनकर्ता विष्णूचा आणि तम हा संहारकर्ता महादेवाचा प्रतीकात्मक गुण आहे. व्यक्तीच्या स्वभावात आणि शरीरात या तिन्ही गुणांचा समतोल राहावा, या भावनेतून शिवाला बेलपत्र अर्पण केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांनीही रावणवधापूर्वी भगवान शिवाची आराधना केली होती, अशी कथा सांगितली जाते.
धोतऱ्याचं फुल हा त्या विषाचे प्रतीक मानला जातो, ज्याचे पान करून शंकर नीलकंठ झाले. त्यातून त्याग, सहनशीलता आणि संरक्षणाचा संदेश दिला जातो. ‘शिव’ होणे म्हणजे सृष्टी आणि पर्यावरण रक्षणासाठी कठीण प्रसंग स्वीकारणे. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने पर्यावरण संवर्धनात सक्रिय भूमिका घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले जात आहे.
दरम्यान, विशेष सणांच्या काळात अनेकजण आपल्या परिसरातील मंदिरांना टाळून मोठ्या किंवा प्रसिद्ध मंदिरांकडे धाव घेतात. त्यामुळे काही निवडक मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी होते. अनेकदा लांबूनच दूध किंवा पाणी फेकून अभिषेक केला जातो, जे योग्य पद्धत मानली जात नाही. याउलट, आपल्या स्थानिक मंदिरात शांततेत आणि एकाग्रतेने पूजा करणे अधिक श्रेयस्कर असल्याचे मत व्यक्त होत आहे. यामुळे स्थानिक मंदिरांनाही बळ मिळते आणि भाविकांनाही समाधानकारक व शांत वातावरणात शिवपूजन करता येते. पर्यावरण संवर्धन आणि श्रद्धा यांचा समतोल साधत पूजा केली, तरच शिवशक्तीची खरी कृपा लाभेल, असा संदेश या पार्श्वभूमीवर दिला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
असं काय झालं की, कुणाल कामरा थेट सुषमा अंधारेंसोबत विधानभवनात पोहोचला... टीशर्टने वेधलं लक्ष!
ADVERTISEMENT











