Vidarbha Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नेलगुंडा गावात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. शेताच्या राखणीसाठी खाटेवर झोपलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. 10 जानेवारीच्या मध्यरात्री उघडकीस आलेल्या या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.
ADVERTISEMENT
मृत शेतकऱ्याचे नाव पुसू नरंगो हबका (वय 66) असे असून, ते नेलगुंडा गावातील रहिवासी होते. नेहमीप्रमाणे पिकांच्या संरक्षणासाठी ते आपल्या घरालगतच्या शेतात खाटेवर झोपले होते. त्यांच्या जवळच दुसऱ्या खाटेवर त्यांची पत्नीही विश्रांती घेत होती. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी पुसू हबका यांच्यावर अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पुसू हबका यांच्या पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिक आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यानंतर तात्काळ नेलगुंडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा : आंतरजातीय प्रेमविवाह, 8 महिन्यांचा मुलगा... पण शेवटी वडिलांनीच मुलीचा संसार केला उद्धवस्त! नेमकं काय घडलं?
या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात शेतीशी संबंधित जुना वाद, जमीन वाद किंवा वैयक्तिक शत्रुत्वातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस विविध शक्यतांच्या आधारे तपास करत असून, परिसरातील संशयितांची चौकशी सुरू आहे. तसेच, गावातील व आजूबाजूच्या परिसरातील हालचालींची माहिती घेतली जात आहे.
नेलगुंडा हा दुर्गम व जंगल परिसरात असलेला भाग असल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. मृत पुसू हबका हे शांत स्वभावाचे, कष्टकरी शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पुसू हबका यांच्या पश्चात पत्नी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. कुटुंबीयांचा आधार हरपल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य बाहेर आणण्याचे आश्वासन दिले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











