बीड : हुंड्यासाठी अजूनही कित्येक कुटुंबांमध्ये सुनांचा छळ सुरूच आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. मात्र, लोकांना अजूनही कायद्याचा धाक दिसत नाहीये. कारण अंबाजोगाई तालुक्यातील गिता गावात शुभांगी संतोष शिंदे (वय 26) या विवाहितेनं आत्महत्या केलीये.
ADVERTISEMENT
हुंड्याच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेत या सुनेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, शुभांगीच्या कुटुंबानं हा आत्महत्या नसून खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी संदीप कासगुंडे फरार आहे.
हे ही वाचा >>देवाच्या दारात चोरी! दान मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनं लाखो चोरले, 500 च्या नोटांचे बंडल कसे लपवायचा?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगीचे 2022 मध्ये लग्न झाले होते. लग्नात माहेरच्यांनी 3 लाख रुपये आणि 5 तोळे सोने हुंडा दिला होता. तरीही सासरच्या लोकांनी व्यवसायासाठी वारंवार पैशाची मागणी केली. माहेरच्यांनी 5 लाख रुपयेही दिले. पण आणखी पैसे देणे शक्य न झाल्यानं शुभांगीला तिचा नवरा, सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला. या त्रासाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
शुभांगीचा भाऊ प्रदिप सोळंके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवालात गळफासाने आत्महत्या झाल्याचं नमूद केलं आहे. मात्र, शुभांगीच्या कुटुंबाचा आक्षेप आहे की, ही आत्महत्या नसून हत्या आहे. याबाबत बर्दापूर ठाण्याचे प्रमुख राजकुमार ससाणे यांनी सांगितले, “शवविच्छेदन अहवालानुसार तपास सुरू आहे. चार आरोपींना अटक झाली असून, फरार आरोपी संदीप कासगुंडेचा शोध सुरू आहे.”
हे ही वाचा >>"महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ", राहुल गांधींनी 5 मुद्द्यांमध्ये 'भाजपचा कट' सांगत केला दावा
या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून, हुंडा प्रथेच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. पोलीस पुढील तपास करत असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
ADVERTISEMENT
