Vasai-Virar: भाई ठाकूरची निर्दोष सुटका, 34 वर्षांपूर्वीचं ‘ते’ भयंकर प्रकरण आहे तरी काय?

भाग्यश्री राऊत

• 05:11 PM • 25 May 2023

देशातला शेवटचा टाडा खटला अखेर संपला. पुणे कोर्टानं सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जाणून घ्या ते प्रकरण आहे तरी काय.

bhai thakurs acquittal what about the suresh dubey murder case of 34 years ago

bhai thakurs acquittal what about the suresh dubey murder case of 34 years ago

follow google news

मुंबई: देशातला शेवटचा टाडा (TADA) खटला अखेर संपला. पुणे कोर्टानं सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूर, गजानन पाटील, दीपक ठाकूर यांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 34 वर्षांनंतर हा निकाल लागला. पण, सुरेश दुबे हत्या प्रकरण नेमकं काय होतं? भाई ठाकूर (Bhai Thakur) कोण होता? भाई ठाकूरवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर (Sharad Pawar) काय आरोप झाले होते? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. (bhai thakurs acquittal what about the suresh dubey murder case of 34 years ago)

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय होतं?

घटना आहे 34 वर्षांपूर्वींची… तारीख 9 ऑक्टोबर 1989. वेळ सकाळी साडेदहा वाजताची आणि ठिकाण होतं नालासोपारा रेल्वे स्थानक. याचठिकाणी बिल्डर सुरेश दुबे यांची एका टोळीनं गोळ्या घालून हत्या केली. हा तोच बिल्डर होता जो वसई-विरारमधला डॉन भाई ठाकूरला भिडला होता. मुंबईवर राज करणारे असे अनेक डॉन त्यावेळी होते. पण, वसई-विरारमध्ये फक्त एका नावाची दहशत होती ती म्हणजे भाई ठाकूर.

हाजी मस्तान, दाऊद इब्राहीमसोबत भाई ठाकूरचं नाव घेतलं जायचं. भाई ठाकूरसमोर कोणाचीही मान वर करून बोलायची हिंम्मत नव्हती. भाई ठाकूर यांनी बोट ठेवली ती मालमत्ता म्हणेल त्या दरात त्याला मिळायची. पण, जिकडे-तिकडे आपली मालमत्ता जमवणाऱ्या भाई ठाकूरला बिल्डर सुरेश दुबे चांगलाच नडला. भाई ठाकूरने मागितलेली मालमत्ता देण्यास त्यानं नकार दिला. भाई ठाकूरने सुरेश दुबेच्या एका प्लॉटवर कब्जा केला होता. दुबेने वकिलामार्फत भाई ठाकूरला नोटीस पाठवली.

हे ही वाचा >> Who is Rupali Barua: 60व्या वर्षी अभिनेता आशिष विद्यार्थीचं लग्न, दुसरी पत्नी अन् गुवाहटी कनेक्शन!

ठाकूर परिवाराची दहशत पाहून आपलं काय होणार हे दुबेला माहिती होतं. तरीही त्यानं हिम्मत दाखवली. घराबाहेर पडणं बंद केलं. शेवटी त्यानं आपल्या मूळ गावाला जायची तयारी केली. पण, दुबे नालासोपारा रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत पेपर वाचत बसले होते. हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला आणि गोळ्या झाडून बिल्डर सुरेश दुबेंची हत्या करण्यात आली.

लोकांसमोर ही हत्या झाली तरीही कोणीही भाई ठाकूरविरोधात बोलायला तयार नव्हतं. दुबेंच्या कुटुंबानं तक्रार दिली. न्याय मागितला आणि भाई ठाकूरसह 17 आरोपींना अटक झाली. याच प्रकरणात 1992 मध्ये टाडा म्हणजे (terrorist and disruptive activities act) लागला. यापैकी भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील यांना सुप्रीम कोर्टानं दोषी ठरवलं आणि टाडाचं जे प्रकरण होतं ते पुणे कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं.

अखेर पुणे कोर्टानं या हत्याकांडाचा निकाल दिला असून या सर्वांची टाडामधून निर्दोष मुक्तता केली आणि देशातला टाडाचं शेवटचं प्रकरण संपलं. हे शेवटचं प्रकरण कसं? तर भाई ठाकूरवर 1992 ला टाडा लागला. पण, टाडाचा दुरुपयोग होत असल्यानं 1995 मध्ये हा कायदा संपुष्टात आणला. टाडामधलं हेच एक शेवटचं प्रकरण होतं. आता ते ही निकाली निघालं.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा यांनी काम पाहिले होते. तर बचाव पक्षाच्या वतीने वकील म्हणून सुदीप पासबोला, सुधीर शहा, रोहन नहार, प्रितेश खराडे यांनी या खटल्यात काम पाहिले आहे.

    follow whatsapp