Dharashiv Crime : धाराशीवच्या भूम तालुक्यातील पाभ्रुड गावात प्रेम प्रकरणातून गुंडांच्या टोळीनं एका मुलाला बेदम मारलं. लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत मुलाला सोडून दिलं. त्यानंतर गेल्या 14 दिवसांपासून बेशुद्धावस्थेत असलेल्या माऊली गिरीवर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आरोपींनी केलेल्या मारहाणीनंतर माऊलीचे जगण्याचे सगळे प्रयत्न अपुरे ठरले. 18 वर्षांच्या माऊली गिरीचा अखेर मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
मृत तरुणाचे वडील बाबासाहेब गिरी यांच्या तक्रारीवरून धाराशीव पोलिसांनी सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. चौघांना अटक झालीय, तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत.
हे ही वाचा >> Pandharpur : विठुरायाच्या दारातले पंखे फक्त मंत्र्यांसाठी? महिलेनं मुश्रीफांना जाब विचारला, व्हिडीओ व्हायरल
धाराशीवच्या पाभ्रुड गावात राहणाऱ्या माऊली गिरीचं एका तरुणीशी प्रेम जडलं होतं. दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागताच मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने तरुणीचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतरही माऊलीचं प्रेयसीसोबत बोलणं सुरू होतं. माऊलीने केलेला मेसेज प्रेयसीच्या नवऱ्याने पाहिला आणि तिथून माऊलीच्या हत्येचा कट रचला गेला.
3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजता परंड्याच्या पांढरेवाडीतून आरोपींनी माऊली गिरीला उचललं, आधी त्याचा फोन बंद केला मग त्याला प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. लोखंडी रॉड, काठ्या आणि धारदार शस्त्रांनी माऊलीवर वार करण्यात आले. मार- मार मारल्यानंतर आता माऊली जगणार नाही, असं समजून आरोपींनी काळेवाडी परिसरातील रस्त्यावर त्याला फेकून दिलं.
हे ही वाचा >> Chandrapur : पाणी भरायला गेलेलेल्या वाघाचा हल्ला, शेतकरी रक्तबंबाळ अवस्थेत विहिरीत उतरला अन्...
गावातील पोलीस पाटलांनी माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी माऊलीला उपचारासाठी जामखेडला आणलं. पण माऊली शुद्धीत येत नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला सोलापुरला हलवण्यात आलं. पण 14 दिवसांनंतर माऊली गिरीचा अखेर मृत्यू झालाय.
धाराशिवमधील या अत्यंत निर्घृण हत्येनंतर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. प्रेम प्रकरणातून एकुलत्या एक मुलाची इतक्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी माऊलीच्या आई-वडिलांनी केलीय. आरोपींवर गुन्हा दाखल झाला, आता पोलीस पुढील कारवाई कशी करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे.
ADVERTISEMENT











