Bharat Jodo Yatra महाराष्ट्रातच थांबवा; गटनेते राहुल शेवाळेंची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

मुंबई तक

16 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:37 AM)

मुंबई : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अशातच आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातच थांबवावी, अशी मागणी एका कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अशातच आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे लोकसभेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रातच थांबवावी, अशी मागणी एका कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

हे वाचलं का?

खासदार शेवाळे म्हणाले, “राहुल गांधी यांनी सावरकरांविरोधात विधान केल्यानं मी आज या व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की, या विधानाची गंभीर दखलं घेऊन ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात थांबवावी. राज्यात कायद्याचं राज्य आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं राज्य आहे, हे दाखवून द्यावं”

“तसेच सर्व शिवसैनिकांनाही मी आवाहन करतो की, जसं बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केलं होतं. त्याप्रमाणं त्यांनीही राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करावं” असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाची आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची क्लिपही दाखविली.

वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

    follow whatsapp