Prashant Kishor यांची मला गरज नाही-शरद पवार

मुंबई तक

• 06:13 AM • 11 Sep 2021

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भेटी या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. मात्र मुंबई तकला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची मला गरज नाही असं म्हटलं आहे. ही सविस्तर मुलाखत लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातलं […]

Mumbaitak
follow google news

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या शरद पवारांच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या भेटी या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. मात्र मुंबई तकला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांची मला गरज नाही असं म्हटलं आहे. ही सविस्तर मुलाखत लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार, काँग्रेस, शिवसेना या सगळ्यावर शरद पवार यांनी मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

प्रशांत किशोर यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले शरद पवार?

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वर्तुळात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चाही सुरू आहे. याबद्दलच पवार म्हणाले, मला प्रशांत किशोरची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल, अशा शब्दांत पवारांनी आपली भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, याबद्दल सुतोवाच केलं.

‘मुंबई तक’शी बोलताना पवार यांनी काँग्रेसची आज दुरवस्था झालीय, असं असलं तरी हा आजही रिलेव्हन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेच, असं पवार म्हणाले. एकप्रकारे पवारांनी दुबळी काँग्रेस हेच तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीपुढचं सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं स्पष्ट केलं.

शरद पवार यांची ही मुलाखत इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई आणि सिनीयर एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी घेतली आहे. आपल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षाबाबतही शरद पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये अजूनही अहंकाराची भावना आहे असं वाटतं का या प्रश्नावर शरद पवार यांनी समर्पक उत्तर दिलं आहे.

शरद पवार मुंबई तकशी बोलताना म्हणाले, ‘मागे मी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमिनीची आता 15-20 एकरवर आलीय. सकाळी जमीनदार उठतो, आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं. तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं. आता नाही.’

यावरच पवारांना म्हणजे काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का, असं विचारण्यात आलं. तेव्हा पवार म्हणाले, ‘तिथंक काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती. आहे नाही. होती हे मान्य केलं पाहिजे. मग (विरोधी पक्ष) जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल.’

    follow whatsapp