जयंत पाटील जळगावमध्ये! आंदोलनाला बसलेल्या खडसेंची भेट; पोलिसांवरही गंभीर आरोप

मुंबई तक

• 12:23 PM • 14 Oct 2022

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील दूध पदार्थांच्या चोरीच्या आरोपानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना भीती वाटत आहे. पोलीस स्वतःचं कर्तव्य टाळत आहेत, त्यामुळे नवं सरकार कसं काम करत आहे त्याचं हे उदाहरणं आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पाटील आज जळगावमध्ये आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील दूध पदार्थांच्या चोरीच्या आरोपानंतरही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना भीती वाटत आहे. पोलीस स्वतःचं कर्तव्य टाळत आहेत, त्यामुळे नवं सरकार कसं काम करत आहे त्याचं हे उदाहरणं आहे, असं म्हणतं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. पाटील आज जळगावमध्ये आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी आले होते, त्यावेळी बोलत होते.

हे वाचलं का?

जिल्ह्यातील राजकारण सध्या जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील वादानं चांगलचं गाजत आहे. संचालक मंडळ बरखास्तीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना आता संघातील चोरीचा मुद्दा समोर आला आहे. अधिकाऱ्यांच्या पातळीवर संघात काही दूध पदार्थांची मोठी चोरी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं खडसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यातच रात्रभर ठिय्या मांडला. तसंच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशन मधून न हलण्याचा पवित्रा एकनाथ खडसेंनी घेतला.

काय म्हणाले जयंत पाटील?

याच आंदोलनस्थळी जयंत पाटील यांनी भेट देऊन खडसे आणि पोलिसांशी चर्चा केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, एफ. आय. आर. दाखल न करता पोलीस चौकशी करण्याचे आश्वासन देत आहे, या हास्यास्पद आहे. पोलिसांचा हा द्राविडी प्राणायाम आहे. हे चुकीचं असून त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे पोलीस कर्तव्यापासून दूर पळत आहेत. त्यामुळे नवं सरकार कसं काम करत आहे त्याचं हे उदाहरणं आहे.

एकनाथ खडसेंचा आरोप काय?

जळगाव जिल्हा दूध संघात वस्तू चोरी गेल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. खडसे म्हणाले, “मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की पोलीस यात सावरासारव का करत आहेत? आज मी वर्तमानपत्रात पोलीस अधीक्षकांचं निवेदन वाचलं की आर्थिक गुन्हा आहे. ७०० खोके बटरचे चोरीला गेलेत. ३६५ खोके दूध भुकटीचे चोरीला गेलेत.

वस्तू चोरीला जाणं हा आर्थिक गुन्हा कसा होऊ शकतो? प्रत्येक चोरी आर्थिक गुन्ह्याचीच असते. कशासाठी एवढी ओढाताण केली जात आहे? चोरीची फिर्याद दिली आहे, तर अपहार कसं म्हणता? चोरी समजून कारवाई केली असती, तर प्रमुख गुन्हेगार झाले नसते. पोलिसांनीच फरार होण्यासाठी मदत केली, असा आमचा आक्षेप आहे”, असा खडसे म्हणाले.

तसंच पोलिसांनी तक्रारीची पोहोच दिली आहे. पण अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या प्रकरणातील संशयित आरोपींना संरक्षण देण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असाही गंभीर आरोप खडसे यांनी केला. पोलिसांच्या मदतीने या प्रकरणातील गुन्हेगार फरार झालेत. माझ्या बाबतीत अशी स्थिती असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, अशी भूमिका खडसेंनी या प्रकरणात मांडली आहे.

    follow whatsapp