Haryana Politics : भाजपला झटका! अपक्ष आमदारांनी सोडली साथ, काँग्रेसला दिला पाठिंबा

मुंबई तक

08 May 2024 (अपडेटेड: 08 May 2024, 10:30 AM)

Independent MLAs haryana politics : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढला आहे.

अमित शाह यांच्यासोबत हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी

follow google news

Haryana Bjp Government : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच भाजपची चिंता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री बदललेल्या हरयाणातील भाजपचे सरकार अल्पमतात आले आहे. तीन अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. भाजपने बहुमत गमावले आहे, मात्र तूर्तास त्यांच्या सरकारला कोणताही धोका नाही. (Three Independent MLAs withdraw support to BJP govt in Haryana)

हे वाचलं का?

हरयाणाच्या राजकारणात मंगळवारी (७ मे) मोठा भूकंप झाला. तीन अपक्ष आमदारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला. अपक्षांमध्ये पुंडरीचे आमदार रणधीर गोलन, निलोखेडीचे आमदार धरमपाल गोंदर आणि चरखी दादरीचे आमदार सोमवीर सांगवान यांचा समावेश आहे. 

या आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. ही राजकीय घडामोड घडल्यानंतर काँग्रेसने लगेचच भाजप सरकारला अल्पमतातील सरकार म्हणण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपने काळजी करण्यासारखे काही नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचा >> 'BJP हा फुटलेला पक्ष नाही मात्र शिवसेना..', CM शिंदेंचं मोठं विधान

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख उदय भान यांच्या उपस्थितीत रोहतक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तीन आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. 

यावेळी अपक्ष आमदार गोंदर म्हणाले की, "आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत. आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांवर आम्ही हा निर्णय घेतला आहे."

12 मार्च रोजी नायब सिंह सैनी यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 13 मार्च रोजी भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. या अचानक झालेल्या राजकीय घडामोडीवर हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले, "मला ही माहिती मिळाली आहे. कदाचित काँग्रेस काही लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यात व्यस्त आहे. आता काँग्रेसला लोकांच्या इच्छेशी काही देणेघेणे नाही."

भाजपकडे आता 40 आमदार; काँग्रेसचा दावा

पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेस प्रमुख उदय भान यांनी दावा केला की, "तीन अपक्ष आमदार सोंबीर सांगवान, रणधीर सिंग गोलेन आणि धरमपाल गोंदर यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. सध्या हरयाणा विधानसभेत 88 सदस्य (90 सदस्यांपैकी) आहेत, त्यापैकी भाजपचे 40 सदस्य आहेत. भाजपला आधी जेजेपी आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, पण जेजेपी पक्षाने पाठिंबा काढलेला आहे आणि आता अपक्षांनी पाठिंबा मागे घेतला आहे."

भाजपच हरयाणातील सरकार संकटात आहे का?

आता प्रश्न असा पडतो की, तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरयाणा सरकार मोठ्या संकटात सापडले आहे का? सरकार अल्पमतात आले आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. 

कारण, भाजपला अजूनही ४५ आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४० आमदार आणि पाच अपक्षांचा समावेश आहे. दुसरा प्रश्न म्हणजे तीन अपक्षांचा पाठिंबा काढून घेतल्याने काँग्रेसला सरकार स्थापनेची काही संधी आहे का? सध्या याचे उत्तर नाही असे आहे.

कारण काँग्रेसकडे तीस आमदार आहेत. आणखी तीन जोडल्यानंतर ही संख्या 33 झाली. त्याचबरोबर जेजेपीचे १० आमदार सध्या काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. आणि गेले तरी ही संख्या फक्त ४३ इतकी होते.

भाजप सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल का?

आता तिसरा प्रश्न असा आहे की काँग्रेस आता भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करायला सांगू शकेल का? उत्तर नाही आहे. कारण 13 मार्चलाच नायब सिंग सैनी यांच्या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. 

सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर ६ महिने विश्वासदर्शक ठराव आणता येत नाही, असा नियम आहे. म्हणजेच १३ सप्टेंबरपर्यंत कोणीही विश्वासदर्शक ठराव आणू शकत नाही.

हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला 'एवढ्या' जागा मिळतील', CM शिंदेंनी आकडाच सांगून टाकला! 

या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत एकच प्रश्न उरतो की तीन आमदारांचा पाठिंबा घेऊन काँग्रेसला आता आपली ताकद का दाखवायची होती? तर याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणूक, जिथे 25 मे रोजी हरयाणातील सर्व जागांवर एकाच वेळी मतदान होणार आहे.

हरयाणा विधानसभेचा आकड्यांचा खेळ काय?

हरयाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. येथे बहुमताचा आकडा हा 46 आहे. म्हणजे कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी किमान 46 आमदारांची गरज असते. मात्र राज्यात दोन जागा रिक्त आहेत.

सध्या 88 आमदार आहेत. कर्नाल लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या खट्टर यांनी कर्नालच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. हरयाणाचे माजी मंत्री रणजीत सिंह चौटाला यांनीही मार्चमध्ये आमदारकीचा राजीनामा दिला होता. रानिया मतदारसंघातून ते अपक्ष आमदार होते आणि त्यांनी 24 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीनामा दिला होता. ते हिसार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा >> मतदान केंद्रावर तुंबळ हाणामारी, ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या

दोन जागा रिक्त झाल्याने बहुमताचा आकडा कमी होऊन 45 इतका झाला आहे. सध्या भाजपचे 40 आमदार आहेत. याशिवाय भाजपला 2 अपक्ष आणि हरयाणा लोकहित पक्षाच्या (गोपाल कांडा) 1 आमदारांचाही पाठिंबा आहे.

पक्षाच्या ४० आमदारांसह एकूण ४७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपला त्यांच्या ४० आमदारांव्यतिरिक्त दोन अपक्ष, एक एचएलपी आणि चार जेजेपी आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे हरयाणाच्या भाजप सरकारला लगेच धोका नाही.

    follow whatsapp