वीज फुकटात तयार होत नाही, वीजबिल भरावंच लागेल; नितीन राऊतांचा इशारा

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात थकीत असलेल्या वीजबिल वसुलीवर महावितरणने जोर दिला असून, थकीत वीजबिलाची सक्तीने वसुली करण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जात आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली जात असून, याच मुद्द्यावर बोलताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. ऊर्जामंत्री आज पुण्यात असून, यावेळी त्यांनी वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांच्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:18 AM • 01 Dec 2021

follow google news

कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात थकीत असलेल्या वीजबिल वसुलीवर महावितरणने जोर दिला असून, थकीत वीजबिलाची सक्तीने वसुली करण्यासाठी राज्यभर मोहीम राबवली जात आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली जात असून, याच मुद्द्यावर बोलताना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली.

हे वाचलं का?

ऊर्जामंत्री आज पुण्यात असून, यावेळी त्यांनी वीजबिल थकलेल्या शेतकऱ्यांच्या वीज जोडणी तोडण्याबद्दल महावितरणची भूमिका मांडली. नितीन राऊत म्हणाले, ‘मला सांगा वीज फुकटात कधीपासून मिळायला लागली? वीज फुकटात तयार होते का? हवेतून तयार होते की, पाण्यातून? विजेला कोळसा लागतो. कोळसा विकत घ्यावा लागतो. प्लान्ट चालवायला पैसा लागतो. बँकांमधून कर्ज काढावं लागतं. त्याचं व्याज द्यावं लागतं. मग वीज वापरता, तर वीजेचं बिल द्यायला अडचण काय?’, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

‘मला वाटतं की मी या खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून 24 तास वीज पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. लॉकडाउनच्या काळात केला. चक्रीवादळाच्या काळात केला. महापुराच्या काळात, अतिवृष्टीच्या काळात प्रयत्न केला, पण याकडे कुणाचं लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी कृषीपंप वीज जोडणीचा कार्यक्रम आम्ही आणलेला आहे. त्यातून वीजेच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच आहे. शंभर रुपये बील असेल, तर त्यातील 33 टक्के गावाला दिला जातो. 33 टक्के जिल्ह्याला मिळतो. अशा पद्धतीने 66 टक्के निधी दिला जातो, ज्यातून नवीन पायाभूत सुविधा उभारल्या जाऊ शकतात’, असं राऊत म्हणाले.

‘भाजपनं ही सवय लावून ठेवली आहे. भाजप मोठी अडचण उभी करून ठेवली आहे. महावितरणवर सध्या 56 हजार कोटी रुपयांचा बोजा आला आहे. आम्ही हा पैसा कुठून आणायचा. या कंपन्या आहेत; या काही सरकार नाही. कंपन्या सरकार होऊ शकत नाही. त्यामुळे वीजबिल भरावंच लागणार आहे. मी फक्त सवलतीने हफ्त्याने वीजबिल भरायची सोय करून देऊ शकतो. ती मी केलेली आहे,’ असं सांगत नितीन राऊत यांनी भाजपकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर टीका केली.

थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीज कनेक्शन कट करण्याचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यात महावितरणकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईला भाजपकडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्यांकडूनही अनेक ठिकाणी आंदोलन करून याचा निषेध केला जाताना दिसत आहे.

    follow whatsapp