Solapur News, विजय बाबर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुलांना विष पाजून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. तीर्थ नावाच्या गावातील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
पत्नीसोबतच्या वादामुळे नैराश्यात
या घटनेतील मृत वडिलांचे नाव भीमा अण्णा वाघमारे (34) असे असून, ते एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, भीमा यांचे त्यांच्या पत्नीसोबत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घरगुती कारणावरुन वाद सुरू होते. वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नीला परत आणण्याचे भीमा यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने ते प्रचंड नैराश्यात होते. याच वैफल्यातून त्यांनी स्वतःसह मुलांचेही आयुष्य संपवण्याचा भयानक निर्णय घेतला.
हे ही वाचा : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ, मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
मुलांसोबत शेतात जाऊन विष प्राशन
घटनेच्या दिवशी भीमा यांनी आपली मुले जान्हवी, प्रगती आणि बाबू यांना वळसंग परिसरातील एका शेतात नेले. तिथे त्यांनी तिन्ही मुलांना विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही विष प्राशन केले. या विषबाधेमुळे भीमा वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले आणि मुलांना उपचारांसाठी हलवले.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप, नागरिकांची उडाली दाणादण
चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक
सध्या तिन्ही चिमुकल्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. डॉक्टर या बालकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, याप्रकरणी पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत. एका सुखी संसाराची अशी राखरांगोळी झाल्याने तीर्थ गावावर शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT











