Weather Report : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असून मराठवाडा आणि विदर्भात याचे सर्वाधिक प्रमाण पाहायला मिळाले आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुलनेने कमी पाऊस झाला, तर कोकण किनारपट्टीवरही पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान परिस्थिती आणि अलर्ट पूर्णपणे बदलला असून पुढील 48 तासांत पावसाचा जोर बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उपग्रह (सॅटेलाइट) चित्रांनुसार सध्या महाराष्ट्रावर ढगांची दाट गर्दी दिसत नसली तरी नैर्ऋत्य मोसमी वारे सक्रिय असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
ADVERTISEMENT
'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर
बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला होता. सध्याच्या परिस्थितीनुसार उत्तर आणि ईशान्य भारतात वेगवेगळ्या वेदर सिस्टीम तयार झाल्याने तिथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागातून येणारे आर्द्रतायुक्त वारे पश्चिमेकडे सरकत असून त्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मॉइश्चर येत आहे. परिणामी, राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार नसला तरी पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील नैर्ऋत्य वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धडकून वर जात असल्याने मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा जोर वाढू शकतो.
हे ही वाचा : गाण्याच्या आवाजावरून रक्तरंजित थरार! मुंबईत बाप-लेकाची निर्घृण हत्या
वादळी वारे आणि विजांच्या कडकडांटासह पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 6 ऑगस्ट रोजी रायगड, पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरात पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक घाट परिसर, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट भागात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत अतिमुसळधार पाऊस अनुभवणाऱ्या विदर्भातील अलर्ट आता मागे घेण्यात आला असून पावसाचा जोर आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराकडे वळला आहे. 7 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा घाट परिसर, रायगड तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली येथे यलो अलर्ट असेल, तर उर्वरित महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : सुनावणीत आरोप-प्रत्यारोप, राऊतांचा बाहेर येत इशारा, मागे सरोदे; काय झालं?
...तरच घराबाहेर पडा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केलेल्या संपूर्ण देशाच्या अंदाजानुसार 6, 7 आणि 8 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रासह ईशान्य भारत, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या भागांत जोरदार पाऊस अपेक्षित आहे. आगामी दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर मुख्यत्वे घाट परिसरात आणि मध्य महाराष्ट्रात जास्त राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्या भागांत ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तिथल्या नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT












