मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यांनी खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये: संजय राऊत

मुंबई तक

• 04:34 AM • 09 May 2021

मुंबई: ‘मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात.’ अशा शब्दात शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या विशेष संपादकीय लेखातून […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: ‘मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात.’ अशा शब्दात शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या रोखठोक या विशेष संपादकीय लेखातून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचा एकतर्फी विजय झाला. निवडणूक आयोग, लाखोंच्या संख्येने उतरवलेले केंद्रीय सुरक्षा दल, सीबीआयसारख्या संस्थांचा वारेमाप वापरही भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोदी-शहा यांनी धार्मिक मतविभागणीसाठी ‘जय श्रीराम’ला प्रचारात उतरविले. 25 वर्षांच्या देवांशू भट्टाचार्यने त्यावर ‘खेला होबे’चा उतारा दिला व पारडे फिरले. मोदी-शहा म्हणजे जय हे समीकरण ‘खेला होबे’ने तोडले.

पश्चिम बंगालचा निवडणूक निकाल, महाराष्ट्राने काय शिकलं पाहिजे? गिरीश कुबेर म्हणतात..

‘पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी नाहीत. देशात मोदींची लाट ओसरली आहे.’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बंगालच्या पराभवानंतर शिवसेना सातत्याने भाजपवर तोंडसुख घेत आहे. अशावेळी संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा अशाच स्वरुपाचं संपादकीय लेख लिहून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा ‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • पश्चिम बंगालात ममता बॅनर्जी यांचा एकतर्फी विजय झाला. निवडणूक आयोग, लाखोंच्या संख्येने उतरवलेले केंद्रीय सुरक्षा दल, सीबीआयसारख्या संस्थांचा वारेमाप वापरही भाजपला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोदी-शहा यांनी धार्मिक मतविभागणीसाठी ‘जय श्रीराम’ला प्रचारात उतरविले. 25 वर्षांच्या देवांशू भट्टाचार्यने त्यावर ‘खेला होबे’चा उतारा दिला व पारडे फिरले. मोदी-शहा म्हणजे जय हे समीकरण ‘खेला होबे’ने तोडले.

  • पश्चिम बंगालात राज्यक्रांती होत आहे, असे स्फोटक वातावरण बनवले. पण भाजपला 80 जागाही जिंकता आल्या नाहीत व ममता बॅनर्जी या 215 जागा जिंकून वरचढ ठरल्या. यावर कोलकाताच्या एका बंगाली संपादकाने मला फोन करून सांगितले, ‘महाराष्ट्राप्रमाणेच बंगालातही चाणक्याचे काहीच चालले नाही. एकच खरा चाणक्य आहे. त्याचे नाव पंडित विष्णुगुप्त. बाकी सगळे झूठ आहेत!’ पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी नाहीत. देशात मोदींची लाट ओसरली आहे व अमित शहा यांनी शर्थ करूनही त्यांना प. बंगालात मोठा विजय मिळवता आलेला नाही, हे या निवडणुकांनी दाखवून दिले.

  • ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला नाहीतर आभाळ कोसळेल, असे वातावरण देशात निर्माण केले गेले. पण शेवटी ममता बॅनर्जींकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जे नव्हते तेच बाईंनी पणाला लावले.

  • या लढ्याची तुलना अहिल्याबाई होळकरांच्या लढ्याशीच करावी लागेल. होळकरांच्या गादीला वारस नसल्याने स्वतः अहिल्याबाईंनी राजशकट हाती घेतले. ही विधवा बाई काय राज्य करणार? अशी दरबारी मंडळींची अटकळ होती. त्यांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड ऊर्फ गंगोबा तात्या हा त्या दरबाऱ्यांचा प्रमुख होता. अहिल्याबाईंना हटविण्यासाठी त्याने राघोबा दादांशी संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी फूस लावली. राघोबा दादा मोठे सैन्य घेऊन इंदूरवर चालून आले.

  • अहिल्याबाईंचा आपल्या समोर काय निभाव लागणार? इंदूर सहज जिंकून घेऊ, असा त्यांचा विश्वास होता. अहिल्याबाईंकडे त्यावेळी फक्त पाचशे महिलांचे पथक होते. त्यांच्या ताकदीवर अहिल्याबाई युद्धास सज्ज झाल्या. त्याआधी त्यांनी नर्मदेपलीकडे डेरा टाकलेल्या राघोबा दादास निरोप पाठवला, ”तुम्हाला लढायची खुमखुमी असेल तर मीही तयार आहे. हातात भाला आणि माझ्या पाचशे वीर महिलांना घेऊन मैदानात उतरले तर तुमची पळता भुई थोडी होईल. हरलात तर काय होईल? मी बाई माणूस असल्याने मला कोणीच हसणार नाही. पण तुमचा पराभव माझ्याकडून झाला तर जगास तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही.” राघोबा दादाला हा निरोप मिळताच त्याचे डोके ठिकाणावर आले. त्याने मध्य प्रदेशातून काढता पाय घेतला. अहिल्याबाईंच्या लौकिकात भर पडली. पश्चिम बंगालात यापेक्षा वेगळे काय घडले?

रडीचा डाव ! ममता बॅनर्जींच्या पराभवानंतर शरद पवारांनी संतप्त प्रतिक्रीया

  • संपूर्ण तृणमूल काँग्रेस फोडण्यात आली. तृणमूलचे नटबोल्ट ढिले केले. तृणमूलमधून फुटलेल्या आमदार व मंत्र्यांना उमेदवाऱयांची रेवडी वाटली. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी व एक मुकुल रॉय सोडले तर इतर सगळे पराभूत झाले. या सगळय़ांसाठी मोदी-शहा व योगी आदित्यनाथ यांनी हजारोंच्या सभा घेतल्या. प. बंगालातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱयास मी निकालाच्या रात्री फोन करून विचारले, ”भाजपचा हा पराभव दारुण आहे, पण मोदी-शहांच्या सभांत व रोड शोना तर रोज तुफान गर्दी होत होती. त्या गर्दीचे पुढे काय झाले?” त्या अधिकाऱयाने एका वाक्यात स्पष्ट केले, ‘ही गर्दी स्थानिक नव्हती. झारखंड, बिहार, ओडिशा या बंगालच्या सीमेवरील राज्यांतून रोज गर्दी विकत आणली जात होती!’

  • प. बंगालात हिंदी भाषिक मोठय़ा प्रमाणावर रोजीरोटीसाठी आले आहेत. ‘जय श्रीराम’च्या गर्जनेचे त्यांना आकर्षण वाटले. ममता बॅनर्जींनी या हिंदी भाषिक मतांकडे पूर्ण दुर्लक्ष करून स्थानिकांना भावनिक साद घातली. बाहेरचे लोक येऊन बंगाल बिघडवत आहेत ते रोखायला हवे, हा त्यांचा प्रचाराचा पहिला मुद्दा. बंगालचा आम्ही गुजरात होऊ देणार नाही, हा दुसरा मुद्दा. त्या मुद्द्यांचे रॉकेट उडाले. ज्यात भाजपची लंका जळाली.

विधानसभा निवडणूक : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय दिला सल्ला?

  • मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकांत अशा खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. हे प. बंगालात दिसले. लोक मग पंतप्रधानांचा पराभव करतात. अमित शहा यांनी उभे केलेले कोणतेही मुद्दे प. बंगालात चालले नाहीत व देशभरातून गोळा केलेली भाजपची फौज प. बंगालातून पराभूत होऊन परत फिरली.

  • हे पानिपतच्या लढाईसारखेच झाले. लोकशाहीतील सर्व परंपरा येथे मोडून पडल्या. भारतीय जनता पक्षाने देशातील राजकीय संस्कृती व परंपरांचे मारेकरी ठरू नये. प. बंगालात परंपरा मोडली, याचा फटका भाजपला बसला हे स्वीकारा. ममता बॅनर्जी यांच्या समोर ‘श्रीराम’चा नारा दिला. तोदेखील चालला नाही. याचे कारण असे की, प. बंगालात ‘जय श्रीराम’चे आकर्षण कधीच नव्हते. तेथे दुर्गा किंवा कालिमातेचे वलय. भाजपने श्रीरामास प्रचारासाठी प. बंगालच्या रस्त्यांवर आणले, पण देवांशू भट्टाचार्य या फक्त 25 वर्षांच्या तरुणाने ‘खेला होबे’ हे गीत तृणमूलसाठी प्रचारात आणले. त्या ‘खेला होबे’ने ‘जय श्रीराम’च्या नारेबाजीवर मात केली. ‘खेला होबे’ म्हणजे ‘आता खेळ होईल.’ ‘खेला होबे’ने संपूर्ण प. बंगालात धुमाकूळ घातला, हे लक्षात घेतले पाहिजे.

    follow whatsapp