महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 52 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 03:18 PM • 30 Aug 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 696 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 62 लाख 68 हजार 112 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97. 2 टक्के इतकं झालं आहे. राज्यात दिवसभरात 3741 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. आज दिवसभरात राज्यात 52 कोरोना बाधित रूग्णांच्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 696 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 62 लाख 68 हजार 112 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97. 2 टक्के इतकं झालं आहे. राज्यात दिवसभरात 3741 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे.

हे वाचलं का?

आज दिवसभरात राज्यात 52 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 38 लाख 12 हजार 827 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 60 हजार 680 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 2 लाख 88 हजार 449 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 2999 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 51 हजार 834 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात 3741 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 64 लाख 60 हजार 680 इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना आहे काळजी घ्या म्हणतात अन् मंत्र्यांना यात्रा काढायला सांगतात -अजित पवार

राज्यात रात्रीची संचारबंदी?

केरळमध्ये ओणम सणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केरळात रुग्णसंख्येत विस्फोटक वाढ झाली असून, केंद्र सरकारने आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्राकडून काही उपाययोजनाही सूचवण्यात आलेल्या आहेत. केंद्राकडून स्थानिक पातळीवरील निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे यांनी रात्रीच्या संचारबंदीचे संकेत दिले.

‘केरळमध्ये ओणमनंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने राज्य सरकारला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केली आहे. आगामी काळातील राज्यातील सण उत्सव पाहता याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं राजेश टोपे म्हणाले. ‘ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत, तिथे शाळा सुरू होऊ शकतात का? याची चाचपणी करत आहोत. 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष अभियान राबवलं जाईल’ असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

    follow whatsapp