शिवशाहीर पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला, पण…: शरद पवार

मुंबई तक

• 06:02 AM • 15 Nov 2021

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबासाहेबांनी ‘महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास हा अत्यंत साध्या भाषेत सांगितला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.’ अशा शब्दात शरद पवार यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. पाहा बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार नेमकं काय म्हणाले: ‘महाराष्ट्राच्या […]

Mumbaitak
follow google news

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाबासाहेबांनी ‘महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास हा अत्यंत साध्या भाषेत सांगितला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला.’ अशा शब्दात शरद पवार यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.

हे वाचलं का?

पाहा बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार नेमकं काय म्हणाले:

‘महाराष्ट्राच्या नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने त्यांनी दिली. या विषयासंबंधी नव्या पिढीमध्ये आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत. त्याच्यामध्ये एका गोष्टीचं.. समाधान म्हणता येणार नाही.’

‘आज ते आपल्यात नाहीत याबाबत दु:ख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास हा राज्याच्या समोर ठेवला. त्यामध्ये काही वादग्रस्त मुद्दे सुद्धा होते. पण त्यासंबंधीचं भाष्य हे करणारा मी स्वत: काही इतिहासाचा जाणकार किंवा तज्ज्ञ नाही.’

‘त्यांनी एक मोठी कामगिरी केली. शिवछत्रपतींच्या चरित्रासाठी आयुष्य खर्ची घातलं. अशा लोकांबाबत काही बदनामी देखील केली जाते. ते यांच्या बाबतही घडलं असावं. त्यात उणीव काढण्याचा प्रयत्न काही जण करत असतात. ते ही त्यांच्या बाबतीत घडलं. पण इतिहासाबाबत आस्था निर्माण करण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचं योगदान मोठं होतं.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.

दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांविषयी प्रतिक्रिया देताना मात्र असं म्हटलं आहे की, बाबासाहेबांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

‘बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता.’

‘ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’ अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन

बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी थोडक्यात

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा’,‘केसरी’यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण ‘राजा शिवछत्रपती’ या कादंबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.

याच कादंबरीवर आधारित पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’हे नाटकही लिहलं. जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एका भव्यदिव्य नाटकांची निर्मिती केली होती. ज्याच हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला होता. दरम्यान, फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते. अनेकदा ते संघाच्या जाहीर कार्यक्रमात देखील सहभागी व्हायचे.

    follow whatsapp