महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चिंता नाही-शरद पवार

मुंबई तक

• 07:47 AM • 10 Jun 2021

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मला कसलीही चिंता नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि आपण कधी सोबत येऊ असं कुणालाही खरं वाटलं नसतं. मात्र आपण हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि […]

Mumbaitak
follow google news

महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत मला कसलीही चिंता नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि आपण कधी सोबत येऊ असं कुणालाही खरं वाटलं नसतं. मात्र आपण हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आणि महत्त्वाचं म्हणजे हा प्रयोग लोकांनी स्वीकारला आहे. आपल्याला लोकांचा विश्वास संपादन करता आला ही बाब महत्त्वाची आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले शरद पवार?

‘आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं. हा पर्याय दिल्यानंतर अनेकजण म्हणत होते की हे सरकार काही दिवसांमध्ये पडेल. काही आठवड्यांमध्ये पडेल, काहींनी महिन्यांचीही मुदत दिली. मात्र तसं काहीही झालं नाही. लोकांना आपण पर्याय दिला आणि लोकांनी तो स्वीकारला.तिन्ही पक्षांनी योग्य पावलं टाकली आणि आज महाविकास आघाडी सरकार चांगल्या पद्धतीने काम करतं आहे.’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर हे किती दिवस टिकाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता मला या सरकारच्या भवितव्याविषयी काहीही चिंता वाटत नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली-शरद पवार

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवरही भाष्य

तीन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमध्ये अजित पवार आणि अशोक चव्हाण यांचाही सहभाग होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा मिनिटांसाठी उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यावरही लोकांनी चर्चा करण्यास सुरूवात केली. मात्र त्या चर्चांना काही अर्थ नाही.

शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली ती भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही’ असं म्हणत शरद पवारांनी टीकाकारांना उत्तर दिलं.

    follow whatsapp